निवडणूक काळात एकही कारवाई न करणारे उत्पादन शुल्क अधिकारी धारेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 19:55 IST2018-07-13T15:03:48+5:302018-07-13T19:55:37+5:30
मनपा निवडणूक अवघ्या १९ दिवसांवर येवून ठेपली आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी मद्याचा वापर होण्याची शक्यता असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मात्र एकही कारवाई न झाल्याने राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने यांनी अधीक्षकांना धारेवर धरले.

निवडणूक काळात एकही कारवाई न करणारे उत्पादन शुल्क अधिकारी धारेवर
जळगाव - मनपा निवडणूक अवघ्या १९ दिवसांवर येवून ठेपली आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी मद्याचा वापर होण्याची शक्यता असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मात्र एकही कारवाई न झाल्याने राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने यांनी अधीक्षकांना धारेवर धरले.
मनपाच्या ७५ जागांसाठी १ आॅगस्ट रोजी मतदान होणार असून या निवडणुकीचा नियोजनाचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने यांनी मनपाच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात आढावा घेतला. या बैठकीला जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, मनपा आयुक्त व मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रकांत डांगे हे उपस्थित होते. तसेच सर्व निवडणूक निर्णय अधिकाºयांसह वन विभागाचे अधिकारी, राज्य परिवहन विभाग, राज्य उत्पादन शुल्क, बॅँक व महसूल विभागाचे अधिकारी देखील उपस्थित होते.
राज्य उत्पादन शुल्काचे ‘आढाव’ यांचा घेतला आढावा
चन्ने यांनी राज्य उत्पादन शुल्काचे अधीक्षक एस.एल.आढावा यांचा खरपुस समाचार घेतला. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर एक ही कारवाई का झाली नाही ? असा प्रश्न चन्ने यांनी विचारला. त्यावर आढाव यांच्याकडून कोणतेही अपेक्षित उत्तर मिळाले नाही. आगामी नियोजनाबाबत देखील आढाव यांनी अपेक्षित उत्तर न दिल्याने चन्ने यांनी आढाव यांना चांगलेच धारेवर धरत आतापर्यंतच्या नियोजनावर तीव्र नाराजी व्यक्त केली. उद्यापासूनच सर्व हॉटेल, बियर बार मधील मद्याच्या विक्रीचा आढावा घेण्याचा सूचनाही त्यांनी दिल्या. यासह पोलीस विभागाकडून देखील चन्ने यांनी निवडणुकीचा आढावा घेतला.
सध्याच्या मतदार यादीत बदल करु नका
मतपत्रिकेचे वाटप करताना अॅपचे वापर करण्याचा सूचना चन्ने यांनी दिल्या. तसेच अंतीम मतदार यादीमध्ये काही चुका असतील तर त्या आता बदल करू नका कारण आता बदल केल्यास घोळ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्याचा मतदार यादीवरच निवडणूका घ्या अशा सूचना चन्ने यांनी दिल्या. मतपत्रिका मतदारांपर्यंत पोहचल्या की नाही ? हे पाहण्याची जबाबदारी मनपा प्रशासनासह सर्वच निवडणूक निर्णय अधिकाºयांचीही असल्याचे त्यांनी सांगितले.