"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 11:30 IST2025-06-20T11:25:27+5:302025-06-20T11:30:40+5:30
शिवसेनेच्या वर्धापनदिनी उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं.

"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
CM Devendra Fadnavis: शिवसेना ठाकरे गटाचा ५९ वा वर्धापनदिन सोहळा गुरुवारी पार पडला. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. मराठी माणसाची शक्ती एकत्र येऊ नये यासाठी काही जण हॉटेलमध्ये गाठीभेटी घेत आहेत असं म्हणत राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांच्या टीकेला आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वाक्यात प्रत्युत्तर दिले.
शिवसेना पक्षाचा ५९ वा वर्धापनदिन सोहळा षण्मुखानंद हॉलमध्ये साजरा झाला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पक्ष फोडाफोडी आणि नेत्यांच्या पळवा-पळवीच्या राजकारणावरून भाजप आणि एकनाथ शिंदे गटावर टीका केली. तसेच जे यांच्या मनात आहे आणि जे राज्याच्या मनात आहे तेच मी करेन. पण ते होऊ नये.. मराठी माणसाची शक्ती एकत्र येऊ नये म्हणून यांच्या मालकाचे नोकर इकडे गाठीभेटी घ्यायला लागल्याचेही उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी प्रहार चित्रपटातील एक डायलॉग म्हणत विरोधकांना इशारा दिला. अंगावर येणार असाल तर मी उभा आहे. कम ऑन किल मी. पण, येताना ॲम्ब्युलन्स घेऊन या. येताना सरळ याल पण जाताना आडवे व्हाल, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
शुक्रवारी क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मृती स्मारकाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जळगाव येथे दाखल झाले असता त्यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं.बोलबच्चन भैरवींना मी उत्तर देत नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना चिमटा काढला. तसेच शरद पवार गटाचे एकनाथ खडसे कार्यक्रमात येणार आहेत का असं विचारलं असता यासंदर्भात मला माहित नाही, असे म्हणत या विषयाला फारसे महत्त्व द्यायला मुख्यमंत्र्यांनी टाळले.