शेजारच्या घरांच्या कड्या लावून पिंप्राळ्यातील संत मिराबाई नगरात घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 17:35 IST2017-11-01T17:33:23+5:302017-11-01T17:35:04+5:30
शेजारच्या व वरच्या मजल्यावरील घराच्या दरवाजाच्या कड्या लावून चोरट्यांनी पिंप्राळ्यातील संत मिराबाई नगरात सागर सुरेश हिंगोणकर यांच्या बंद घराचे कुलुप तोडून रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा ५० हजाराचा ऐवज लांबविल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे, मात्र गुन्हा दाखल झालेला नाही.

शेजारच्या घरांच्या कड्या लावून पिंप्राळ्यातील संत मिराबाई नगरात घरफोडी
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,१ : शेजारच्या व वरच्या मजल्यावरील घराच्या दरवाजाच्या कड्या लावून चोरट्यांनी पिंप्राळ्यातील संत मिराबाई नगरात सागर सुरेश हिंगोणकर यांच्या बंद घराचे कुलुप तोडून रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा ५० हजाराचा ऐवज लांबविल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे, मात्र गुन्हा दाखल झालेला नाही.
खासगी इलेक्ट्रॉनिक्स टॉवरचे अभियंता असलेले सागर हिंगोणकर हे मुळचे अकोला येथील रहिवाशी आहे. नोकरीनिमित्त ते जळगावात स्थायिक झाले आहेत. योगेश आत्माराम पाटील यांच्या मालकीच्या गट क्र.३१५/१/१ च्या प्लॉट क्र.२७ मधील घरात भाड्याने राहतात. योगेश पाटील हे वरच्या मजल्यावर राहतात. पत्नी व मुलगी दिवाळीनिमित्त यवतमाळ येथे माहेरी गेल्या आहेत तर हिंगोणकर हे २५ दिवसापासून मुंबई येथे प्रशिक्षणाला गेलेले आहेत. त्यामुळे हे घर बंद होते.
घर मालकालाच कोंडले
घर मालक योगेश पाटील हे वरच्या मजल्यावर राहतात. सकाळी त्यांचा मुलगा शाळेत जाणार असल्याने ते उठले असता घराचा दरवाजा बाहेरुन बंद होता. त्यामुळे त्यांनी शेजारी राहणारे ईश्वर पाटील यांना फोन करुन दरवाजाची कडी उघडायला लावली. खाली हिंगोणकर यांच्या घराच्या दरवाजाचे कुलुप तुटले होते तर बेडरुमध्येही दरवाजा उघडा होता. घरातील सामान अस्ताव्यस्त झालेला होता. त्यामुळे त्यांनी सागर हिंगोणकर यांना मोबाईलवरुन घटनेची माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ५ ग्रॅमची अंगठी व दहा ग्रॅमचे पत्नीचे दागिने व १५ हजार रुपये रोख असा ऐवज कपाटात होता. हा ऐवज गायब झालेला होता. कपाट उघडे होते. नेमकी किती ऐवज गेला हे घर मालक घरी आल्यावर स्पष्ट होईल. दरम्यान, शेजारी राहणाºया आणखी दोन घरांच्या दरवाजाच्याही कड्या चोरट्यांनी लावल्या होत्या. घटनेची माहिती मिळाल्यानंतर रामानंद नगर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. घरमालक घरी नसल्याने गुन्हा दाखल होऊ शकला नाही.