जळगाव : दहावी-बारावी पुरवणी परीक्षा कालावधीत परीक्षा व अभ्यासाचा ताण आणि परीक्षेच्या भीतीमुळे विद्यार्थी दडपणाखाली येऊन नकारात्मक विचार करतात व कधी कधी टोकाची भूमिका घेतात. अशा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व निकोप वातावरणात विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावी म्हणून नाशिक विभागीय मंडळांकडून समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
इयत्ता दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. दहावी व बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी तसेच एटीकेटीसाठी पात्र विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट होणार आहेत. राज्य माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे पुरवणी परीक्षा घेतली जाणार असून, दहावीची लेखी परीक्षा २२ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत होईल. बारावीची परीक्षा १६ सप्टेंबर ते ११ ऑक्टोबर या कालावधीत होईल. इयत्ता दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा २१ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर दरम्यान होईल. दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या ताणतणावविषयक समस्यांचे व शंकांचे निरसन करण्यासाठी व अनिष्ट घटना टाळण्यासाठी समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही सुविधा १६ सप्टेंबर ते ११ ऑक्टोबर या कालावधीपर्यंत विद्यार्थ्यांसाठी असेल.
असे आहेत समुपदेशक
नाशिक जिल्ह्यासाठी किरण बावा, धुळे जिल्ह्यासाठी नंदकिशोर उद्धवराव बागूल, जळगाव जिल्ह्यासाठी बापू माधव साळुंखे यांची, तर नंदुरबार जिल्ह्यासाठी राजेंद्र माळी यांची समुपदेशक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.