आता तरी पगार हुईंन का रे भो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:11 IST2021-06-19T04:11:56+5:302021-06-19T04:11:56+5:30
एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा जून महिन्यातील पंधरा दिवस उलटुनही मे महिन्याचा पगार हातात पडलेला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक चणचण जाणवू ...

आता तरी पगार हुईंन का रे भो
एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा जून महिन्यातील पंधरा दिवस उलटुनही मे महिन्याचा पगार हातात पडलेला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक चणचण जाणवू लागली आहे. आतापर्यंत दरमहा पगार वेळेवर होतांना, मे महिन्याच पगार पुन्हा रखडल्याने कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे जळगाव आगारातील अनेक कर्मचारी आता आता तरी पगार हुईंन का रे भो, अशी चर्चा करतांना दिसून येत आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांचा दर महिन्याला ७ तारखेला पगार होतो. गेल्या वर्षी कोरोनामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे सहा महिन्यांपर्यंत पगार विलंबाने झाले. दोन ते तीन महिन्यातून एक पगार हातात पडत होता. यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना उसनवारीने पैसे आणून, संसाराचा गाडा ओढावा लागल्याचे प्रकार समोर आले. यात राज्यभरात काही कर्मचाऱ्यांनी पगार नसल्यामुळे आत्महत्याही केल्या. त्यानंतर राज्य शासनाने महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या पगाराची जबाबदारी घेऊन, एप्रिल पर्यंत नियमित पगार केले. मात्र, आता मध्येच शासनाने मे महिन्याचा पगार न केल्यामुळे, शासनाने जबाबदारी झटकली की काय, असा प्रश्न कर्मचाऱ्यांमधुन उपस्थित होत आहे. तर पगार रखडण्याची चर्चा, आगारातील कर्मचाऱ्यांमध्ये जोराने सुरू आहे.