७ बाधितांचा मृत्यू, २५२ नवे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:17 IST2021-03-27T04:17:09+5:302021-03-27T04:17:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाने शहरातील आणखी सात बाधितांचा बळी घेतला असून शहरातील मृत्यूचे प्रमाण गेल्या काही दिवसांपासून ...

७ बाधितांचा मृत्यू, २५२ नवे रुग्ण
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाने शहरातील आणखी सात बाधितांचा बळी घेतला असून शहरातील मृत्यूचे प्रमाण गेल्या काही दिवसांपासून वाढले आहेत. हे मृत्यू रोखणे प्रशासनासमोरील मोठे आव्हान आहे. दुसरीकडे संसर्ग थांबत नसून शुक्रवारी शहरात २५२ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, चिंताजनक बाब म्हणजे अतिदक्षता विभागात दाखल रुग्णांची संख्या वाढून ४१३ वर पोहोचली आहे.
शहरासह जिल्ह्यात कोरोना संसर्ग थांबत नसल्याचे गंभीर चित्र आहे. जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी ११०० पेक्षा अधिक रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यात शहरातील २५२ रुग्णांचा समावेश आहे. शहरात दोन दिवसात १० बाधितांच्या मृत्यूची नोंद आहे. जिल्ह्याच्या तुलनेत शहरात अधिक मृत्यू होत आहेत. शहरातील मृतांची संख्या ३६५ वर पोहोचली आहे. गंभीर बाब म्हणजे काही मृत्यू हे रुग्णालयात दाखल केल्याच्या काही तासात होत असल्याचा निष्कर्ष मृत्यू परीक्षण समितीने काढला आहे.
शहरातील ३६ वर्षीय, ४८, ५०, ६०, ६३ वर्षीय पुरुषासह ४९ व ५९ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. भुसावळ तालुक्यातील २, जामनेर तालुक्यातील २, रावेर, यावल, अमळनेर, चोपडा या तालुक्यातील प्रत्येकी १ बाधिताचा मृत्यू झाला आहे.
सक्रिय रुग्ण १०,७३४
लक्षणे नसलेले रुग्ण : ८,१३२
लक्षणे असलेले रुग्ण : २,६०२
ऑक्सिजन पुरवठा करावा लागणारे रुग्ण : ९८०
अतिदक्षता विभागातील रुग्ण : ४१३
अहवाल प्रलंबितचे प्रमाण वाढले
जिल्हयातील आरटीपीसीआर तपासणीच्या प्रलंबित अहवालांची संख्या १३६० वर पोहोचली आहे. गुरूवारी १२६७ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ३६३ बाधित आढळून आले आहेत तर ॲन्टिजेनच्या ५,८४९ चाचण्या करण्यात आल्या. त्यात ८३३ रुग्ण बाधित आढळून आले आहेत.
पत्रकार सूर्यभान पाटील यांचे कोरोनाने निधन
जळगाव : इलेक्ट्रॉनिक माध्यमाचे पत्रकार सूर्यभान भास्कर पाटील (३४, मूळ पिंप्री बु. ता. एरंडोल, ह. मु. पिंप्राळा परिसर) यांचे शुक्रवारी दुपारी कोरोनामुळे निधन झाले. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या ठिकाणी गेल्या दहा ते बारा दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. दोन दिवसांपूर्वी प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होत. शुक्रवारी त्यांची प्राणज्योत मालावली. ९ मार्च रेाजी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. एक दिवस कोविड केअर सेंटरला दाखल झाल्यानंतर त्यानंतर त्यांना डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात हलविण्यात आले होते. त्यांच्या निधनानंतर सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, भाऊ, वहिनी असा परिवार आहे.