छत्रपतींच्या स्वराज्यातील मावळ्यांप्रमाणे तरुणांनी जगणे स्वीकारावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:27 IST2021-02-15T04:27:35+5:302021-02-15T04:27:35+5:30
भोकरदन : छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य हे अठरापगड जातींना बरोबर घेऊन चालणारे आहे. परस्त्री ही मातेसमान असल्याचे संस्कार ...

छत्रपतींच्या स्वराज्यातील मावळ्यांप्रमाणे तरुणांनी जगणे स्वीकारावे
भोकरदन : छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य हे अठरापगड जातींना बरोबर घेऊन चालणारे आहे. परस्त्री ही मातेसमान असल्याचे संस्कार देणाऱ्या राजमाता जिजाऊंच्या स्वराज्यात आपण जगत आहोत. या राज्यात या ठिकाणी राहणाऱ्या प्रत्येक तरुणाने छत्रपतींच्या स्वराज्यातील मावळ्यांप्रमाणे ताठ मानेने जगणे स्वीकारावे, असे प्रतिपादन शिवव्याख्याता, कीर्तनकार शिवलीला पाटील बार्शीकर यांनी केले.
भोकरदन तालुक्यातील बाभुळगाव येथे शिवजयंतीनिमित्त अखिल भारतीय महिला वारकरी संघटनेच्या महाराष्ट्र राज्य कार्यअध्यक्षा कीर्तनकार शिवलीला पाटील यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विजय देवरे, गजानन गाढे, विशाल गाढे यांची प्रमुख उपस्थिती होती. आजचे तरुण हे दिशाहीन होत चालले आहे. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यातील तरुण हा व्यसनाकडे वळाला आहे. केवळ शिवजयंतीच्या कार्यक्रमातून शिवाजी महाराजांवरील प्रेम न दाखवता त्यांच्या स्वप्नातील स्वराज्य घडवण्यासाठी युवकांनी एक आदर्श नागरिक तयार होणे काळाजी गरज आहे. छत्रपतींचे स्वराज्य हे अख्ख्या जगात आदर्श आहे. मग त्या राज्यातील मावळा हा सर्वच संस्कृतीसाठी वरचढ आहे. असे असताना पाश्चात्य संस्कृतीचा अवलंब करून छत्रपतींच्या स्वराज्याला बदनाम करू नका, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी टाळकरी सेवेसाठी ज्ञानेश्वर माऊली लिंगेवाडीकर, प्रकाश महाराज लिंगेवाडीकर, नितीन महाराज शिंदे बेल्होरा, प्रकाश महाराज शिंदे लिंगेवाडीकर, अर्जुन महाराज देवरे, शंकर महाराज राऊत, प्रमोद महाराज सहाणे निमगांव, सांडू पाटील राऊत, प्रल्हाद बनसोडे, चोपदार राजू महाराज शिरसाठ यांनी साथ दिली. कार्यक्रमासाठी शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष हादी चाऊस, उपाध्यक्ष समाधान काळे यांच्यासह पदाधिकारी, ग्रामस्थानी परिश्रम घेतले.
चौकट
महिलांनी मालिकांवर नव्हे तर मुलांवर लक्ष द्यावे
आजच्या महिला या मालिका अन् चित्रपटाकडे वळाल्या असून, बालकांवर करावयाचे संस्कार ही बाब विसरुन गेल्या आहेत. महिलांनी मालिका न बघता आजचा मुलगा हा भविष्यातील चांगला नागरिक कसा होईल ? यासाठी काम करावे असे आवाहनही त्यांनी केले.