ग्रामपंचायतच्या १२०२ अर्जातून २६८ जणांची माघार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:40 IST2021-01-08T05:40:10+5:302021-01-08T05:40:10+5:30
मंठा : तालुक्यात होऊ घातलेल्या ५० ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी २६८ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे ...

ग्रामपंचायतच्या १२०२ अर्जातून २६८ जणांची माघार
मंठा : तालुक्यात होऊ घातलेल्या ५० ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी २६८ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. सध्या निवडणूक रिंगणात ९३४ उमेदवार राहिले आहेत. या पैकी २८ उमेदवार बिनविरोध निवडून गेल्याने आता मतदान प्रक्रियेत ९०६ उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत.
मंठा तालुक्यातील मतदान प्रक्रियेतून ५० ग्रामपंचायतींसाठी एकूण ४१८ सदस्य निवडले जाणार आहेत. ही मतदान प्रक्रिया १५६ प्रभागात होणार असल्याचे निवडणूक विभागाचे गणेश खराबे यांनी सांगितले. या निवडणुकीसाठी तालुक्यात चांगलेच राजकीय वातावरण तापलेले दिसून येत आहे. शिवाय सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. केंद्र सरकारच्या नव-नवीन योजनांमुळे प्रभावित झालेले नवतरुण या निवडणुकीत जास्त उत्साही दिसत आहेत. मागील पंचवार्षिकमध्ये जनतेतून सरपंचाची निवड झाल्याने मंठा तालुक्यात दोन ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली होती. तीन ग्रामपंचायतसाठी सदस्य बिनविरोध तर फक्त सरपंचांसाठी निवडणूक झाली होती; परंतु यंदा एकमेकांच्या तडजोडीतून फक्त २६८ उमेदवारी अर्ज परत घेण्यात आले आहेत, तर २८ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. मतदान रिंगणात असलेले ९०६ उमेदवार प्रचार कामाला लागले आहेत. तर मतदान प्रक्रियेची प्रशासकीय सर्व तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार घोबाळे व प्राधिकृत अधिकारी सुमन मोरे यांनी दिली.