लग्न झालं, वऱ्हाड निघालं, गाडी थांबली अन् वधू पळाल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:21 IST2021-01-13T05:21:00+5:302021-01-13T05:21:00+5:30

दीपक ढोले जालना : मुलींचे प्रमाण कमी झाल्याने बहुतांश तरुणांना वधू मिळणे कठीण झाले आहे. वधू मिळण्यासाठी वर कितीही ...

The wedding took place, the bridegroom left, the car stopped and the bride ran away | लग्न झालं, वऱ्हाड निघालं, गाडी थांबली अन् वधू पळाल्या

लग्न झालं, वऱ्हाड निघालं, गाडी थांबली अन् वधू पळाल्या

दीपक ढोले

जालना : मुलींचे प्रमाण कमी झाल्याने बहुतांश तरुणांना वधू मिळणे कठीण झाले आहे. वधू मिळण्यासाठी वर कितीही पैसे मोजण्यासाठी तयार असतात. त्यातून त्यांची फसवणूक झाल्याच्या काही घटनासमोर आल्या आहेत. अशीच फसवणूक गुजरातमधील जुनागड जिल्ह्यातील तीन तरुणांची झाली. बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथील तीन मुलींनी वकिलाकडून बॉन्ड करून या तीन तरुणांशी ७ जानेवारी कायदेशीर रोजी लग्न केले. त्यानंतर ८ जानेवारीला रात्री आठ वाजण्याच्या सुमारास तीन वर, तीन वधू व अन्य एक व्यक्ती एका कारने गुजरातकडे निघाले. जालना शहराजवळील नागेवाडी येथे आल्यावर मुलींनी लघुशंकेचे निमित्त करत गाडी थांबयाला लावली. त्यानंतर या तीनही मुली तीन मोबाईल, रोख रक्कम ३० हजार असा ४० हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन फरार झाल्या.

याप्रकरणी गुजरात येथील पियुष शांतीलाल यांच्या फिर्यादीवरून सोमवारी रात्री चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुजरात येथील पियुष शांतीलाल वसंत (रा. जुनागड) यांच्या तीन मित्रांचे लग्न जमत नव्हते. त्यांनी वसंत यांना मुलगी पाहण्यास सांगितले. जालना येथील मित्र पाशाभाई (पूर्ण नाव माहीत नाही) याला फोन करून मुलींबाबत विचारणा केली. त्याने वसंत यांना २ जानेवारी रोजी जालना येथे बोलावून घेतले. त्यानंतर तीन मुलांसह ते देऊळगाव येथे गेले. तेथील एका महिलेने तीन मुली दाखविल्या. तिन्ही तरुणांनी लग्न करण्यास होकार दिला. त्यानंतर पियुष वसंत हे आपल्या मित्रांसोबत जालना शहरातील एका हॉटेलवर थांबले. लग्नासाठी खरेदी केली. ७ जानेवारी रोजी वकिलाकडून बॉन्ड करून तिन्ही मुलींशी कायदेशीर लग्न केले. आम्ही आईकडे जाऊन येतो, असे म्हणून मुली देऊळगावराजा येथे निघून गेल्या. ८ जानेवारी रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास त्या परत आल्या. त्यानंतर तीन मुली, अन्य एका व्यक्तीसह वाहनाने गुजरातकडे निघाल्या. जालना - औरंगाबाद रोडवरील नागेवाडी येथे आल्यावर मुलींनी लघुशंकेचे निमित्त करत गाडी थांबवायला लावली. अंधाराचा फायदा घेऊन मुली फरार झाल्या. पियुष वसंत यांनी संबंधित महिलेला फोन करून मुली पळून गेल्याचे सांगितले असता, त्या महिलेने त्यांनाच धमकी दिली. तुम्ही पळून जा, नाहीतर तुम्हाला बघून घेईन, असे ती म्हणाली. यानंतर पियुष वसंत यांच्या फिर्यादीवरून सोमवारी रात्री चंदनझिरा पोलीस ठाण्यात सहा जणांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक रेणुका वाघ करीत आहेत.

गुजरात येथील तीन तरुणांना लग्नाचे अामिष दाखवून फसवले आहे. याप्रकरणी सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस आरोपींचा शोध घेत असून, त्यांना तातडीने अटक करू.

श्यामसुंदर कौठाले, पोनि. चंदनझिरा, पोलीस

Web Title: The wedding took place, the bridegroom left, the car stopped and the bride ran away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.