जिल्ह्यात चार गावांमध्ये टँकरद्वारे पाणी

By Admin | Updated: May 6, 2014 12:20 IST2014-05-06T12:19:26+5:302014-05-06T12:20:05+5:30

टंचाईच्या झळा : आणखी काही टँकरचे प्रस्ताव तालुकास्तरावर पडून

Water tankers in four villages in the district | जिल्ह्यात चार गावांमध्ये टँकरद्वारे पाणी

जिल्ह्यात चार गावांमध्ये टँकरद्वारे पाणी

जालना : जिल्ह्यात उन्हाच्या तीव्रतेमुळे पाणीटंचाईच्या गावांची संख्याही वाढत असून जालना तालुक्यातील आणखी दोन गावांना ६ मे पासून दोन टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, आणखी काही गावांच्या टँकरचे प्रस्ताव तालुकास्तरावरच पडून असल्याचे काही ग्रामस्थांनी सांगितले. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने तयार केलेल्या पाणीटंचाई निवारण कृती आराखड्यानुसार एप्रिल ते जून २०१४ या काळात ४१३ गावे आणि १६९ वाड्यांसाठीचा प्रस्ताव सादर केला होता. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात जालना तालुक्यात डुकरी पिंप्री व निपाणी पोखरी या दोन गावांमध्ये टँकर सुरू करण्यात आले. मात्र याच तालुक्यात हडप आणि उटवद या दोन गावांमध्येही तीव्र टंचाई असल्याने तेथेही टँकर सुरू करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. भोकरदन, घनसावंगी, अंबड, बदनापूर, जाफराबाद या तालुक्यातील काही ग्रामपंचायतींनी निवारणासाठी दाखल केलेले प्रस्ताव अद्याप ‘जैसे थे’ असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. याबाबत जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस.एम. कदम यांना विचारणा केली असता, टँकरच्या आवश्यकेनुसार त्या त्या गावांमध्ये टँकर सुरू करण्यात येत आहेत. याशिवाय उपाययोजनांची विविध कामेही त्या-त्या गावांमध्ये तत्परतेने सुरू असल्याचे कार्यकारी अभियंता एस.एम. कदम यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

जिल्हाधिकार्‍यांची सूचना

४ज्या टंचाईग्रस्त गावात पाण्याचे टँकरची गरज असेल, तेथे ते सुरू करण्याच्या दृष्टीने संबंधित अधिकार्‍यांनी लक्ष द्यावे. त्याचप्रमाणे टंचाईग्रस्त गावांमध्ये उपाययोजनांसाठी तत्परतेने कार्यवाही करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी संबंधित अधिकार्‍यांना केली आहे.

Web Title: Water tankers in four villages in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.