प्रकल्प तुडूंब तरीही ग्रामस्थांना करावी लागतेय पाण्यासाठी पायपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:56 IST2021-02-06T04:56:38+5:302021-02-06T04:56:38+5:30
राजूर : भोकरदन तालुक्यातील चांधई एक्को व बाणेगाव मध्यम प्रकल्प तुडूंब भरलेले असतांना अपुरा वीजपुरवठा होत असल्याने राजूरसह पंधरा ...

प्रकल्प तुडूंब तरीही ग्रामस्थांना करावी लागतेय पाण्यासाठी पायपीट
राजूर : भोकरदन तालुक्यातील चांधई एक्को व बाणेगाव मध्यम प्रकल्प तुडूंब भरलेले असतांना अपुरा वीजपुरवठा होत असल्याने राजूरसह पंधरा गावांचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. ग्रामस्थांना हंडाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी राजूर ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी सहाय्यक अभियंत्यांकडे निवेदनाव्दारे केली आहे.
यावर्षी समाधानकारक पावसामुळे बाणेगाव व चांधई एक्को मध्यम प्रकल्प तुडूंब भरलेले आहेत. दोन्ही प्रकल्पातून राजूरसह चांधई एक्को, राजुरेश्वर मंदिर, चांधई टेपली, बाणेगाव, खामखेडा, चांधई ठोंबरी, जावळेवाडी, लोणगाव, चिंचोली निपाणी आदी पंधरा गावांना पाणीपुरवठा केला जातो. परंतु, महावितरण कंपनीकडून एक दिवसाआड आठ तास वीजपुरवठा सुरू ठेवल्या जात असल्याने मुबलक पाणी मिळत नाही. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दोन्ही प्रकल्पापासून सदर गावे सात ते आठ किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे आठ तासात होणारा पाणीपुरवठा कमी पडत आहे. मुबलक पाणी असतांनाही महावितरणच्या हलगर्जीपणामुळे ग्रामस्थांना हंडाभर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. येत्या सोमवारपासून राजुरेश्वर जन्मोत्सव सोहळा सुरू होणार असल्याने भाविकांच्या गर्दीत वाढ होणार आहे. त्यामुळे भाविकांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागणार असल्याची शक्यता आहे.
बारा तास सुरळीत वीजपुरवठा करण्याची मागणी
महावितरण कंपनीने चांधई ठोंबरी फिडरमधून दररोज किमान बारा तास सुरळीत वीजपुरवठा केल्यास पाणी समस्येची तीव्रता कमी होऊ शकते. त्यासाठी बारा तास सुरळीत वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर सरपंच भाऊसाहेब भुजंग, ग्रामविकास अधिकारी जगन खैरे, माजी सरपंच मुसा सौदागर, विनोद डवले, रामेश्वर सोनवणे, आप्पासाहेब पुंगळे, निवृत्ती पुंगळे, राहुल दरक, संतोष मगरे, शिवाजी जगताप, दादाराव मगरे, बबन मगरे, विष्णू राज्यकर, कृष्णा जाधव आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.