धावडा (जि. जालना) : वडिलांच्या निधनानंतर मुलांनी १० एकर शेती वाटून घेतली आणि आईच्या नावे ३१ गुंठे जमीन ठेवली. परंतु, ८० वर्षीय वृद्ध आईचा सांभाळ न करता तिला घरातून हाकलून लावल्याची घटना हिसोडा बु., ता. भोकरदन येथे घडली. या प्रकरणात वृद्धेने दिलेल्या तक्रारीवरून मुलांसह नातवाविरुद्ध शुक्रवारी पारध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंडित बाळा बावस्कर, भास्कर बाळा बावस्कर, अशोक बाळा बावस्कर, दशरथ बाळा बावस्कर व श्रीराम भास्कर बवस्कर (सर्व रा. हिसोडा बु.) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. कमलाबाई बाळा बावस्कर (वय ८०) यांनी पारध पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पतीच्या निधनानंतर मुलांनी जमीन आपापसात वाटून घेतली आणि आई कमलाबाई बावस्कर यांच्या नावे ३१ गुंठे ठेवली. ती जमीनही मुलेच कसतात. परंतु, त्या बदल्यात पैसे अथवा अन्नधान्यही देत नव्हते. त्यामुळे कमलाबाई बावस्कर यांनी तुम्ही माझी शेतजमीन पेरणी करता; परंतु मला काही देत नाही. यापुढे माझी शेतजमीन मी पेरेल किंवा दुसऱ्याला ठोक्याने देईन, असे सांगितले. त्यावेळी नातू श्रीराम भास्कर बावस्कर हा अंगावर धावून गेला आणि म्हातारे, आमच्याशिवाय तुला दुसरे कोण आहे. तू दुसऱ्याला शेतजमीन कसण्यासाठी दिली तर तुला जिवे मारून टाकू अशी धमकी त्याने दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. आजवर मजुरी करून पोट भरले; परंतु, वय झाल्याने तेही होत नाही. मुलं संभाळत नाहीत. मुलं आणि नातू त्रास देत देतात. ६ जून रोजी मुलांनी घरातून बाहेर काढल्याचे तक्रारीत म्हटले आहे. कमलाबाई बावस्कर यांनी दिलेल्या तक्रारीवरून चार मुलांसह एका नातवाविरुद्ध पारध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सपोनि. एस. डी. माने हे करीत आहेत.
या कलमान्वये गुन्हा दाखलकमलाबाई बावस्कर यांच्या तक्रारीनुसार त्यांची चार मुले व नातवाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ कलम ११५ (२), ३५१ (२), ३५१ (३), ३ (५), ज्येष्ठ नागरिक आणि पालक यांचे पालनपोषण आणि कल्याण अधिनियम २००७ कलम २४ नुसार पारध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.