शिक्षक संवेदनशील असावाच : कुलकर्णी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:30 IST2021-02-10T04:30:58+5:302021-02-10T04:30:58+5:30
जालना : शैक्षणिक वातावरणात अनेक घटना घडतात, ज्यामुळे नकारात्मक सूर येतो. परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि विद्यार्थी ...

शिक्षक संवेदनशील असावाच : कुलकर्णी
जालना : शैक्षणिक वातावरणात अनेक घटना घडतात, ज्यामुळे नकारात्मक सूर येतो. परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि विद्यार्थी हितासाठी शिक्षकाने संवेदनशील असायलाच पाहिजे, असे मत शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी रविवारी साने गुरुजी कथामाला पदाधिकारी बैठकीत बोलताना व्यक्त केले.
जुना जालना भागातील भाग्यनगर परिसरातील संस्कार प्रबोधिनी माध्यमिक विद्यालयात साने गुरुजी कथामालेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रतिमा कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष डॉ. सुहास सदाव्रते, उपाध्यक्ष प्रा. दिगंबर दाते, रामदास कुलकर्णी, बी. एम. सय्यद, मीनाक्षी देशमुख, प्रा. रमाकांत कुलकर्णी, जगदीश वैष्णव, अंबादास नन्नवरे यांची उपस्थिती होती.
पुढे कुलकर्णी म्हणाले की, आज एकाच शाळेत अनुदान, विनाअनुदानासह अनेक स्तर आहेत की, ज्यामुळे शिक्षकांची मानसिकता कशी टिकेल, असा प्रश्न आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करायला शिकवितो, तोच खरा शिक्षक असतो, असे सांगून साने गुरुजींच्या संवेदनशील विचारांचा शोध घेणारा शिक्षक असावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रत्यक्ष वर्गात शिकविण्यापेक्षा प्रश्न आणि समस्येत अडकलेला शिक्षक यातून सुटला पाहिजे, अशी व्यवस्था निर्माण होणे गरजेचे असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. बैठकीत अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला, जालना शाखेने राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती यावेळी देण्यात आली. संस्कार प्रबोधिनी विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक रामदास कुलकर्णी यांनी तयार केलेल्या ऑनलाईन शिक्षण मोबाईल स्टॅण्डची शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी प्रशंसा केली. साने गुरुजी कथामालेचे पदाधिकारी पवन कुलकर्णी यांनी आभार मानले.
फोटो
जालना : अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला पदाधिकारी बैठकीत हेरंब कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.