बदल्यांची लगीनघाई
By Admin | Updated: May 6, 2014 11:36 IST2014-05-06T11:26:37+5:302014-05-06T11:36:55+5:30
जालना : जिल्हा परिषदेत मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच बदल्यांची लगीनघाई सुरू झाली आहे.

बदल्यांची लगीनघाई
बदल्यांची लगीनघाई
जालना : जिल्हा परिषदेत मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच बदल्यांची लगीनघाई सुरू झाली आहे. यंदाही बदल्या समुपदेशन पद्धतीनेच होणार असून बदलीपात्र कर्मचार्यांच्या याद्या तयार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरवर्षी मे हा बदल्यांचा महिना. त्यामुळे बदलीसाठी इच्छूक असलेल्या कर्मचार्यांनाही बदल्यांचे वेध लागलेले आहेत. यावर्षी निवडणूक आचारसंहितेमुळे निवडणुक निकालानंतर ही प्रक्रिया होईल, असा अंदाज होता. परंतु गेल्या एक-दोन दिवसांपर्यंत बदली प्रक्रियेचा कार्यक्रम घोषित न झाल्याने कर्मचार्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. मात्र ३ मे रोजी बदली प्रक्रियेचा कार्यक्रम जाहीर झाल्याने बदलीपात्र कर्मचार्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. ज्या कर्मचार्यांना एकाच ठिकाणी १० वर्षे झाली, त्यांच्या प्रशासकीय बदल्या होणार आहेत. तर ज्यांना ५ वर्षे पूर्ण झाली, त्यांना विनंतीवरून बदलीचा पर्याय आहे. काही कर्मचारी बदल्यांसाठी आपसात समन्वय साधण्याचा प्रयत्न प्रक्रियेपूर्वीच करतात. जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय बदल्यांच्या प्रक्रियेचा कार्यक्रम शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्हास्तरीय बदली प्रक्रिया १७ ते २३ मे आणि तालुकास्तरीय प्रक्रिया २६ ते ३१ मे या कालावधीत होणार आहे. जिल्हास्तरीय बदल्या जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात समुपदेशन पद्धतीने पार पडणार आहेत. (प्रतिनिधी)