रब्बीतील पिकांची पेरणी दीड पटीने वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:25 IST2021-01-14T04:25:55+5:302021-01-14T04:25:55+5:30
बदनापूर : गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. परिणामी शेतकऱ्यांनी रब्बी हंगामावर अधिक भर दिला ...

रब्बीतील पिकांची पेरणी दीड पटीने वाढली
बदनापूर : गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. परिणामी शेतकऱ्यांनी रब्बी हंगामावर अधिक भर दिला आहे. तालुक्याचे रब्बी पिकांचे क्षेत्र सरासरी १४६९२ हेक्टरवर आहे. यंदा मात्र, तब्बल २४७३५.५ हेक्टरवर पेरा झाला असून, दीड ते पावणेदोन पटीने हा पेरा वाढला आहे.
बदनापूर तालुक्यात पाच महसूल मंडळ असून, यापैकी बदनापूर महसूल मंडळात एकूण १६ गावांचा समावेश आहे. या सर्व गावांमध्ये एकूण ९७५७ हे भौगोलिक क्षेत्र आहे. ७३५१.२ हेक्टर क्षेत्र पेरणी योग्य आहे. या क्षेत्रापैकी २४४८ हे क्षेत्रात रब्बीतील अन्नधान्य पिके व ५६२ हेक्टरवर कडधान्यांची पेरणी झाली आहे. रोषणगाव महसूल मंडळात एकूण १६ गावांचा समावेश आहे. या सर्व गावांमध्ये एकूण १४५६२.८ हेक्टर भौगोलिक क्षेत्र असून, १२९८८.५ हेक्टर पेरणी योग्य क्षेत्र आहे. या क्षेत्रापैकी ४९५१ हेक्टर क्षेत्रात रब्बीतील अन्नधान्य व गळीत धान्य पिके व १४८४ हेक्टरवर कडधान्यांची पेरणी झाली आहे. दाभाडी महसूल मंडळात एकूण २० गावांचा समावेश आहे. या सर्व गावांमध्ये एकूण १४५२८.५ हेक्टर भौगोलिक क्षेत्र असून, ११८१६.७ हेक्टर पेरणी योग्य क्षेत्र आहे. या क्षेत्रापैकी ४९३० हेक्टर क्षेत्रात रब्बीतील अन्नधान्य व गळीत धान्य पिके व १००२ हेक्टरवर कडधान्यांची पेरणी झाली आहे.
शेलगाव महसूल मंडळात एकूण २० गावांचा समावेश आहे. या सर्व गावांमध्ये एकूण १६३२६.१२ हेक्टर भौगोलिक क्षेत्र असून, १२९३०.७ हेक्टर पेरणी योग्य क्षेत्र आहे. या क्षेत्रापैकी ६१७० हेक्टर क्षेत्रात रब्बीतील अन्नधान्य व गळीत धान्य पिके व २०२३ हेक्टरवर कडधान्यांची पेरणी केली आहे. बावणे पांगरी महसूल मंडळात एकूण १६ गावांचा समावेश आहे. या सर्व गावांमध्ये एकूण २१३४२.२ हे भौगोलिक क्षेत्र असून, १६८१२.३ हेक्टर पेरणी योग्य क्षेत्र आहे. या क्षेत्रापैकी ६२१६.५ हेक्टर क्षेत्रात रब्बीतील अन्नधान्य व गळीत धान्य पिके व ११८० हेक्टरवर कडधान्यांची पेरणी झाली आहे.
गहू, हरभरा, मक्याचा पेरा अधिक
तालुक्यात रब्बी ज्वारी, मका, गहू, हरभरा अशी रब्बी पिके व जवस, करडईसह इतर तेलबियांची पेरणी करण्यात आली आहे. तालुक्यात सध्या विहिरींच्या पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे गहू, हरभरा, मक्याचा पेरा सरासरीपेक्षा अडीच पटीने वाढला आहे. अनेक वर्षांनंतर यंदा तालुक्यात प्रथमच रब्बी पिकांचा पेरा कमालीचा वाढला आहे. तालुक्यातील पीरवाडी, धनगरवाडी व राजेवाडी या गावांमधील रब्बी पिकांचा पेरा मात्र शून्य दिसत आहे.