१९ हजार शेतकऱ्यांना वीज वितरणाचा 'शॉक'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:36 IST2021-02-17T04:36:47+5:302021-02-17T04:36:47+5:30

जालना : महावितरण कंपनीने शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाच्या वसुलीसाठी ५० टक्के सवलत याेजना लागू करून वीजपुरवठा खंडित करण्याचा धडाका लावला ...

'Shock' of electricity distribution to 19,000 farmers | १९ हजार शेतकऱ्यांना वीज वितरणाचा 'शॉक'

१९ हजार शेतकऱ्यांना वीज वितरणाचा 'शॉक'

जालना : महावितरण कंपनीने शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाच्या वसुलीसाठी ५० टक्के सवलत याेजना लागू करून वीजपुरवठा खंडित करण्याचा धडाका लावला आहे. तालुक्यातील १९ हजार कृषिपंपांची वीज तोडण्यात आली असून, त्यामुळे हजारो हेक्टरवरील रब्बीची पिके धोक्यात आली आहेत.

यापूर्वी अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले. रब्बीतील गहू, हरभरा आदी पिके चांगली आली आहेत, तर मोसंबी, द्राक्ष, पेरू, अंबा आदी फळबागाही फुलल्या आहेत. शेतकऱ्यांच्या हाती काही दिवसांत ही पिके येणार आहेत. परंतु, महावितरणने थकीत वीजबिल वसुलीसाठी चक्क वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेतली आहे. मोसंबीच्या बागेला पाणी दिले नाही तर मोसंबीची फुलगळ, गुंडीगळ होऊन शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार आहे. शासनस्तरावरून या बाबींचा गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे. हरभरा घाटे अवस्थेत तर गहू लोंब्या अवस्थेत आहे. वेळेवर पाणी मिळाले नाही तर येथेही उत्पादनामध्ये घट होणार आहे.

तालुक्यात ३३ केव्हीचे १४ व १३२ केव्हीचे चार उपकेंद्र आहेत. या उपककेंद्रांतून शेतीला वीजपुरवठा केला जातो. वीजबिलापोटी आजवर १९ हजार कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे.

मोहीम सुरूच राहणार

आजवर जवळपास १९ हजार कृषिपंपांची वीजतोडणी करण्यात आली आहे. थकीत वीजबिलाच्या वसुलीसाठी उर्वरित दिवसांत आणखी वीजजोडणी कट केली जाणार आहे. शेतकऱ्यांनी थकीत वीजबिले भरून योजनेचा लाभ घ्यावा.

व्ही.एस. कुलकर्णी

उपकार्यकारी अभियंता, जालना ग्रामीण

Web Title: 'Shock' of electricity distribution to 19,000 farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.