नोकरभरती थांबवावी, अन्यथा गावागावात एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:27 IST2021-02-08T04:27:27+5:302021-02-08T04:27:27+5:30

जालना : मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना राज्य सरकार भरती काढत आहेत. त्यामुळे मराठा समाजातील तरुणांवर अन्याय होणार ...

Recruitment should be stopped, otherwise Elgar in villages | नोकरभरती थांबवावी, अन्यथा गावागावात एल्गार

नोकरभरती थांबवावी, अन्यथा गावागावात एल्गार

जालना : मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना राज्य सरकार भरती काढत आहेत. त्यामुळे मराठा समाजातील तरुणांवर अन्याय होणार आहे. यावर मराठा मंत्री मूग गिळून गप्प आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी साडेसतरा हजार पदांची भरती आरोग्य खात्यात काढली आहे. ही भरती त्यांनी थांबवावी नाही तर गावागावात एल्गार मेळावे घेण्यात येतील, असा इशारा आ. विनायक मेटे यांनी बोलताना दिला.

जालना येथे रविवारी शिवसंग्राम संघटनेच्या वतीने घेण्यात आलेल्या मराठा एल्गार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुंबई मराठा क्रांती मोर्चा समन्वयक राजन घाग, सुभाष जावळे, सुदर्शन धांडे, सुनील कोतकर, उदय आहेर, प्रा. प्रशांत गोळे, सचिन मिसाळ, प्रा. लक्ष्मण नवले, नीलेश गोर्डे, नारायण टकले, ॲड. लक्ष्मण उढाण, श्याम उढाण, सचिन बळीराम शेळके, विराज जोगदंड, किशोर चव्हाण, उमेश बर्वे, मनोज वाटाणे आदींची उपस्थिती होती.

सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेले मराठा समाजाचे आरक्षण आणि राज्य सरकारकडून होत असलेला चालढकलपणा याचा आ. विनायक मेटे यांनी खरपूस समाचार घेतला. मराठ्यांसोबत घाट घालाल तर तुम्हाला घाटावर पोहोचवू, असा इशारा त्यांनी मंत्र्यांना दिला.

मंत्री अशोक चव्हाण यांच्या तोंडाला सध्या कुलूप लावलेले आहे. मुख्यमंत्र्यांच्या मनात देखील मराठा समाजाबद्दल पाप आहे का, हे शोधण्याची वेळ आली आहे. मराठा समाजाचे आरक्षण टिकवणे हे राज्य सरकारच्या हातात आहे; परंतु राज्य सरकार तारीख पे तारीख देत सुटले आहे. मराठा समाजाच्या मुलांच्या भविष्यावर नांगर फिरवणार असाल तर तुमचे महाल सुरक्षित राहणार नाहीत. असे म्हणत १ एप्रिलपर्यंत राज्यातील सर्व नोकर भरती पुढे ढकला अन्यथा दिल्लीतील शेतकऱ्यांसारखे आंदोलन करू, असा इशारा आ. मेटे यांनी दिला.

मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी शिवसंग्रामचे नीलेश गोर्डे, प्रशांत गोले, प्रा. लक्ष्मण नवले, नारायण टकले यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

..........

चौकट

शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा

राज्य सरकारने मराठा समाजास झोपेत असताना धोंडा घालण्याचे काम करू नये. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी याबाबत पुढाकार घेऊन एक बैठक घ्यावी आणि मराठा आरक्षणासंबंधीचा निर्णय सकल मराठा समाजाला सांगावा, असे आवाहनदेखील विनायक मेटे यांनी केले.

Web Title: Recruitment should be stopped, otherwise Elgar in villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.