एक हजार ५३४ कृषीपंपांचा वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:31 IST2021-02-16T04:31:53+5:302021-02-16T04:31:53+5:30

जाफराबाद : थकीत वीजबिलाचे कारण पुढे करत महावितरणकडून तालुक्यातील १६७ रोहित्रांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. या रोहित्रांवरील १ ...

Power supply to 1,534 agricultural pumps cut off | एक हजार ५३४ कृषीपंपांचा वीजपुरवठा खंडित

एक हजार ५३४ कृषीपंपांचा वीजपुरवठा खंडित

जाफराबाद : थकीत वीजबिलाचे कारण पुढे करत महावितरणकडून तालुक्यातील १६७ रोहित्रांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. या रोहित्रांवरील १ हजार ५३४ कृषी पंपांची वीज गुल झाली असून, ऐन हातातोंडाशी आलेली पिके आता पाण्याअभावी धोक्यात आली आहेत. ‘महावितरण’ने अचानक राबविलेली ही मोहीम मात्र, शेतकऱ्यांच्या मुळावर उठली आहे.

महावितरण कंपनीकडून करण्यात आलेल्या कारवाईमध्ये जाफराबाद तालुक्यातील विशेष म्हणजे ज्या भागात बागायत रब्बीचे क्षेत्र जास्त आहे. त्या भागातील १ हजार ५३४ ग्राहकांच्या शेतीपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. या भागात १० कोटी ९६ लक्ष रुपये वीज बिल थकीत असल्याचे सांगितले जात आहे.

गतवर्षीच्या खरीप हंगामातील पिके शेतकऱ्यांच्या हातून गेली होती. रब्बी हंगामातही रोगराईसह इतर संकटांचा सामना करून शेतकऱ्यांनी पिके जगविली आहेत. रब्बीतील ऊस, गहू, हरभऱ्यासह इतर पिके सध्या बहारात आहेत. या पिकांमुळे चांगले उत्पन्न हाती मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. परंतु, महावितरण कंपनीने अचानक थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी कृषीपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेतली आहे.

हिवाळा संपला असल्याने सध्या उन्हाची तीव्रता वाढत आहे, गहू, हरभरा, ज्वारी, उसासह इतर पिकांना पाणी देण्याची गरज आहे. परंतु, वीजपुरवठा खंडित झाल्याने या पिकांना पाणी देता येत नाही. अगोदरच शेतकरी अस्मानी संकटांनी हैराण झालेले आहेत. त्यात आता महावितरण कंपनीकडून कारवाईचा शॉक दिला जात आहे.

या कारवाईमुळे रब्बी पिके धोक्यात आली असून, वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.

चार उपकेंद्रांतर्गत शेतकऱ्यांना फटका

जाफराबाद तालुक्यात १५ हजार ४६ ग्राहकसंख्या असून, वीजबिलाची २११ कोटी रुपये थकीत आहे. मात्र, बिल वसूल करण्यासाठी महावितरण कंपनी यांनी शेतकऱ्यांना कोणतीही सूचना न देता तालुक्यातील हिवराकाबली, टेंभुर्णी, माहोरा, जाफराबाद उपकेंद्रातील विद्युत पुरवठा खंडित केला आहे.

कोट

कृषी पंपांचे थकीत वीज बिल वसूल होणे गरजेचे आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांनुसार वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहेे. शेतकऱ्यांनी शासकीय योजनेनुसार ५० टक्के वीज बिल भरले तर त्यांचे उर्वरित बिल कृषी धोरणांतर्गत माफ होणार आहे.

व्ही. आर. गांधीले, उपकार्यकारी अभियंता, जाफराबाद

Web Title: Power supply to 1,534 agricultural pumps cut off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.