यशस्वी होण्यासाठी जिद्द, चिकाटी महत्त्वाची : ह.भ.प. ज्ञानेश्वर शेलूदकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:27 IST2021-02-08T04:27:10+5:302021-02-08T04:27:10+5:30
दैठणा खु. येथे कीर्तन सोहळा ; भविकांची मोठी उपस्थिती परतूर : यशस्वी होण्यासाठी जिद्द व चिकाटी महत्त्वाची आहे, असे ...

यशस्वी होण्यासाठी जिद्द, चिकाटी महत्त्वाची : ह.भ.प. ज्ञानेश्वर शेलूदकर
दैठणा खु. येथे कीर्तन सोहळा ; भविकांची मोठी उपस्थिती
परतूर : यशस्वी होण्यासाठी जिद्द व चिकाटी महत्त्वाची आहे, असे निरूपण ह.भ.प. ज्ञानेश्वर शेलूदकर यांनी केले. तालुक्यातील दैठणा खु. येथील मोरेश्वर संस्थानच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी रात्री ज्ञानेश्वर शेलूदकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते.
ह.भ.प. शेलूदकर म्हणाले की, कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी जिद्द, चिकाटी महत्त्वाची आहे. ध्येय गाठण्यासाठी तोल सांभाळणे गरजेचा आहे. कारण उंचीवर गेल्यावर चुकलात, तर खाली येण्याची भीती असते. त्यामुळे एकदा मोठे झाल्यानंतर मोठे कसे राहता येईल, यासाठी प्रयत्न करायला हवे. शूरवीरांच्या गप्पा मारणं सोप आहे; पण रणांगणावर जाऊन युद्ध करणं अवघड असते. या देशाला संत, सती व शूर या तिघांनी सजवले आहे. त्यामुळे देशाचा जवान दिसला की, माझी मान झुकते, कारण आमचा सैनिक सीमेवर डोळ्यात तेल घालून उभा आहे, म्हणून आम्ही सुखाने झोपू शकतो, सुरक्षित राहू शकतो. भारत ही संतांची भूमी आहे. सेवा ही साधना आहे. पण ती कोणाची करावी, याला फार महत्त्व आहे. संतांनी प्राप्त करून घेतलेला ज्ञानरूपी ठेवा आपल्याला सहज मिळतो. कोणतीही गोष्ट मिळण्यासाठी परिश्रमाची गरज असते. यात थोडीही चूक झाली तर सर्वनाश व्हायला वेळ लागत नाही, असेही ते म्हणाले. यावेळी उपसरपंच संपत टकले, सुरेश सवने, अमृत सवने, अनिल मगर यांच्यासह मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती होती.
फोटो.
परतूर तालुक्यातील दैठणा खु. येथे कीर्तनात निरूपण करताना ह.भ.प. ज्ञानेश्वर शेलूदकर आदी.