ग्रामपंचायत सदस्य निघून गेल्याने सभा तहकूब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:30 IST2021-02-13T04:30:31+5:302021-02-13T04:30:31+5:30
बदनापूर : तालुक्यातील मालेवाडी ग्रामपंचायतच्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडणुकीत दोन्ही पदांसाठी उमेदवारांना समसमान मते पडल्यानंतर ग्रामपंचायत सदस्य सभा ...

ग्रामपंचायत सदस्य निघून गेल्याने सभा तहकूब
बदनापूर : तालुक्यातील मालेवाडी ग्रामपंचायतच्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडणुकीत दोन्ही पदांसाठी उमेदवारांना समसमान मते पडल्यानंतर ग्रामपंचायत सदस्य सभा सोडून निघून गेले. ग्रामपंचायत निवडणुकांच्या इतिहासात प्रथमच एक अनपेक्षित घटना असून, निवडणूक निर्णय अधिकारीही भांबावले होते. निवडणूक प्रशिक्षणातही ग्रामपंचायत सदस्य सभेतून निघून गेले तर काय करावे? याची माहिती मिळालेली नसल्याने ही सभा तहकूब करण्यात आली.
मालेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी सभा आयोजित करण्यात आली होती. येथील सरपंचपदाचे आरक्षण हे सर्वसाधारण गटासाठी आहे. या ग्रामपंचायतमध्ये एकूण सात ग्रामपंचायत सदस्य असून, नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये सात सदस्य निवडून आले आहेत. मात्र शुक्रवारी झालेल्या सभेस सहा ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. एक ग्रामपंचायत सदस्य हजर नव्हते. सरपंचपदाच्या निवडणुकीकरिता वर्षा कृष्णा कडोस व राधाबाई परमेश्वर कडोस व उपसरपंचपदासाठी बाबासाहेब बबन बोरुडे व योगीता अरुण कडोस यांचे उमेदवारी अर्ज आले होते. त्यामुळे या दोन्ही पदांसाठी हात उंचावून मतदान घेण्यात आले. दोन्ही पदांकरिता समसमान प्रत्येकी तीन मते मिळाली. त्यानंतर पुढील प्रक्रिया करण्यासाठी यापैकी एकही ग्रा.पं. सदस्य तयार नव्हते व उपस्थित सर्व ग्रामपंचायत सदस्य सभा सोडून निघून गेले. त्यामुळे ही सभा तहकूब केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी पी. जी. बनसोडे व ग्रामसेवक के. डी. ढाकणे यांनी दिली.
कोट
दोन्ही उमेदवारांना समसमान मते मिळाल्यानंतर व ग्रामपंचायत सदस्य निघून गेले. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी सभास्थळावरून आमच्याकडे ताबडतोब मार्गदर्शनासाठी संपर्क केला नाही. त्यांनी तहसील कार्यालयात येऊन ही माहिती दिली. त्यानंतर पुढील प्रक्रियेसाठी उशीर झाला असता. त्यामुळे आता शनिवारी मालेवाडी ग्रामपंचायतीत सभा आयोजित करण्यात आली आहे.
छाया पवार, तहसीलदार