जालना बाजारपेठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:27 IST2021-02-15T04:27:13+5:302021-02-15T04:27:13+5:30

(संजय लव्हाडे) जालना, दि.१४ : खाजगी व्यापारी कापसाला अधिक चांगला भाव देत असल्याने शेतकरी सीसीआयकडे कापूस विक्री करण्यास ...

Jalna Market | जालना बाजारपेठ

जालना बाजारपेठ

(संजय लव्हाडे)

जालना, दि.१४ : खाजगी व्यापारी कापसाला अधिक चांगला भाव देत असल्याने शेतकरी सीसीआयकडे कापूस विक्री करण्यास अनुत्सुक आहेत. शेतकऱ्यांचा प्रतिसाद नसल्याने सीसीआयचे खरेदी केंद्र सोमवारपासून बंद होण्याची शक्यता आहे. किराणा व धान्य बाजारात ग्राहकी चांगली असून, धान्य मालाचे भाव स्थिर, तर बहुतांश किराणा मालाच्या दरात तेजी आहे. सोने तोळ्यामागे एक हजार रुपयांनी स्वस्त झाले असून, चांदीचे दर स्थिर आहेत.️ सीसीआयच्या तुलनेत खाजगी व्यापाऱ्यांकडे कापूस विक्री करणे शेतकऱ्यांना सोयीचे आणि फायदेशीर वाटू लागले आहे. सीसीआयकडे कापसाचा खरेदी दर ५,७२५ रुपये, तर खाजगी व्यापाऱ्यांकडे ६,००० ते ६,१०० रुपये प्रतिक्विंटल असा आहे. सीआयकडे कापसाच्या पैशासाठी थांबावे लागते, तर खाजगी व्यापारी लगेच कापसाचे पैसे देतात. या कारणामुळे सीसीआयचे कापूस खरेदी केंद्रात शेतकरी फिरकेनासे झाले. यामुळे कापूस खरेदी केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे कळते. सर्व प्रकारचे खाद्यतेल क्विंटलमागे २०० रुपयांनी महागले. जागतिक बाजारपेठेत तेलाच्या भडकलेल्या किमती आणि स्थानिक बाजारात तेलाची वाढती मागणी यामुळे तेलाच्या दरात तेजी आली. पामतेल ११,७००, सोयाबीन तेल १२,१००, सरकी तेल १२,००० आणि करडी तेलाचे दर १७,००० ते १८,००० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत. वनस्पती तूप महागले असून, डब्यामागे १०० रुपयांची तेजी आल्यानंतर भाव १,४५० ते १,७०० रुपये प्रतिडबा असे आहेत. शेंगदाण्यात १०० रुपयांची, साबुदाण्याच्या दरात ४०० रुपयांची तेजी आली. शेंगदाण्याचे दर ८,५०० ते १०,०००, तर साबुदाण्याचे दर ४,५०० ते ५,२०० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत. नवा गहू आणि ज्वारी बाजारात आली आहे. गव्हाची आवक दररोज ३०० पोते इतकी असून, भाव स्थिर म्हणजे १,६५० ते २,५०० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत. ज्वारीची आवक दररोज ४०० पोती असून, भाव १,३०० ते २,५०० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत. तुरीची आवक दररोज ३ हजार पोती असून, २०० रुपयांच्या मंदीनंतर भाव ६,४०० ते ७,१५१ रुपये प्रतिक्विंटल असे आहेत. अर्थसंकल्पातील जीएसटीच्या नियमांतील नव्या तरतुदींमुळे उद्योजक, व्यापारी, सीए, कर सल्लागार आदी सर्वच जण धास्तावले आहेत. टॅक्स चोरी आणि इनपुट टॅक्स क्रेडिटमधील घोटाळे थांबवण्यासाठी शासनाने ज्या उपाययोजना अवलंबिल्या आहेत, त्या जाचक असल्याचे बहुतांश करदात्यांचे म्हणणे आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ येत्या २६ फेब्रुवारी रोजी भारत बंदची हाक देण्यात आली आहे. सोयाबीनची आवक दररोज ३०० पोती असून, १०० रुपयांच्या तेजीनंतर भाव ४,५५० ते ४,६०० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत. सोने एक हजार रुपयांनी स्वस्त झाले असून, दर ४९,२०० रुपये प्रतितोळा आहे. चांदीचा दर स्थिर म्हणजे ७१,५०० रुपये प्रतिकिलो असा आहे.

Web Title: Jalna Market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.