परमार्थात जो आनंद आहे, तो कुठेही नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:28 IST2021-02-07T04:28:49+5:302021-02-07T04:28:49+5:30
महाकाळा (अंकुशनगर) : भगवंताच्या नामस्मरणामध्ये, भजनामध्ये जो आनंद आहे, त्यामुळे सर्व दु:ख दूर होतात. दु:खामध्ये दु:ख देण्याचे ...

परमार्थात जो आनंद आहे, तो कुठेही नाही
महाकाळा (अंकुशनगर) : भगवंताच्या नामस्मरणामध्ये, भजनामध्ये जो आनंद आहे, त्यामुळे सर्व दु:ख दूर होतात. दु:खामध्ये दु:ख देण्याचे सामर्थ्य राहत नाही. म्हणून त्यामध्ये आनंद मिळतो. परमार्थात जो आनंद आहे, तो जगात कुठेही मिळू शकत नाही. अशा प्रकारच्या आनंदाचा उपभोग घेणारे आपण सारे वारकरी आहोत, देव कुणाच्याही पोटी जन्म घेत नाहीत, त्यासाठी हजारो वर्षांची पुण्याई लागते, असे हभप लक्ष्मण महाराज मेंगडे यांनी सांगितले.
अंबड तालुक्यातील भगवाननगर येथे संत वामनभाऊ, संत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या काल्याच्या कीर्तनात ते बोलत होते. यावेळी हभप जगन्नाथ सांगळे, हभप शिवाजी उगले, हभप हरिदास सुळे, जि.प. सभापती बाळासाहेब म्हस्के, अशोक चिमणे, संतोष आदमाने, संजय कव्हळे आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना महाराज म्हणाले की, कुठल्याही कार्यक्रमाची सांगता काल्याच्या कीर्तनाने होते. काल्याचे कीर्तन ज्यांना भगवत गीतेचे ज्ञान त्यांनीच करावे. संत वामनभाऊ यांनी महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाचे खूप मोठे कार्य केले. अशा थोर महात्म्याची पुण्यतिथी साजरी केल्याने समाजामध्ये नवचैतन्य निर्माण होते. संत वामनभाऊ, संत भगवान बाबांनी स्वत:चा जीव समाजातील घटकांसाठी चंदणाप्रमाणे झिजविला. मेंगडे महाराज यांनी आपल्या ओघवत्या भाषेतील मनोगताने सर्वांना मंत्रमुग्ध करून टाकले. शुद्धत्व कधीही संपत नसते, तर त्यामध्ये सातत्याने वाढ होत असते. असे न संपणारे शुद्धत्व वारक-यांकडे असते. वारकरी संप्रदाय आपल्या परीने जनजागृती व सामाजिक कार्य करण्याचा प्रयत्न करत असतो, असेही ते म्हणाले.
फोटो ओळी
भगवाननगर येथे काल्याच्या कीर्तनात बोलताना हभप लक्ष्मण महाराज मेंगडे व इतर.