सततचा ताण आणि औषधांच्या माऱ्याने गेले डोक्यावरचे केस !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:04 IST2021-09-02T05:04:55+5:302021-09-02T05:04:55+5:30
जालना : कोरोनातून बरे झाल्यानंतर अनेकांना केस गळतीची समस्या उद्भवत आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिकचा ताण न घेता तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार ...

सततचा ताण आणि औषधांच्या माऱ्याने गेले डोक्यावरचे केस !
जालना : कोरोनातून बरे झाल्यानंतर अनेकांना केस गळतीची समस्या उद्भवत आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिकचा ताण न घेता तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार उपचार घेणे गरजेचे आहे.
कोरोनासारखा आजार असो किंवा इतर कोणताही गंभीर आजार असो, या आजारात औषधांच्या माऱ्यामुळे केस गळतीची समस्या होऊ शकते. आजारपणातून उठल्यानंतर तीन महिने हा त्रास जाणवू शकतो. परंतु, याबाबत अधिक काळजी न करता योग्य आहार, उपचार करून केस गळती थांबवता येते.
कोविडनंतर ३ महिन्यांनी गळू लागतात केस
कोरोनासह इतर कोणताही आजार असेल तर त्या आजारातून बरे झाल्यानंतर तीन महिने केस गळू शकतात. योग्य उपचार आणि काळजी घेतल्यानंतर ही समस्या दूर होते. परंतु, तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ ही समस्या जाणवत असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
हे करा
आजार कोणताही असो संबंधित रुग्णांनी मनावर अधिकचा ताण घेऊ नये.
आजारपणातून बाहेर पडल्यानंतर दोन्ही वेळचे जेवण वेळेवर करणे गरजेचे आहे. जेवणात फळांचा वापर करावा.
ड्रायफ्रूट्समध्ये काजू, बदाम, मनुके, खजूर आदींचे सेवन करणेही फायदेशीर ठरणारे आहे.
भरपूर पाणी पिण्यासह मुबलक दूध पिणे गरजेचे आहे.
तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानंतरच करा घरगुती उपाय
कोरोनासारख्या आजारातून बरे झाल्यानंतर योग्य आहार, औषध घेण्यासह काही काळ नियमित आराम करावा.
केस गळतीचा त्रास जाणवत असेल तर तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घ्यावेत.
केस गळतीचा प्रकार रोखण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करून नको ते प्रयोग करू नयेत.
योग्य उपचार महत्त्वाचे
आजारपणानंतर डोक्यावरील केस गळण्याची समस्या उद्भवू शकते. योग्य उपचार, सकस आहार, भरपूर पाणी, दूध पिल्याने हा आजार दूर होतो.
- डॉ. नीलेश पुंड, केशविकार तज्ज्ञ