जालना : नोकरीचे आमिष दाखवून तरूणांना लाखो रूपयांना लुटणाऱ्याचे अपहरण करून त्याला सातारा येथे घेवून गेलेल्या नऊ जणांना सदर बाजार पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. वैभव भैरू पाटील (वय २१. रा. तिरपण्या जि. कोल्हापूर), सतीश गराडे (वय २३ रा. आमनेवाडी जि. कोल्हापूर), प्रशांत संभाजी पवार (वय २९ रा. करंजोशी जि. कोल्हापूर), पुष्पराज मारोती जाधव (२६ रा. युलुर जि. सांगली), वैभव भास्कर शेशवारे (३५. रा. अगरण धुळगाव, जि. सांगली), मनोहर भास्कर शेशवारे (४२ रा. अगरण धुळगाव जि. सांगली), नितीन बाळू दाढे (२३, रा. वाफळे जि. सोलापूर), गणेश पांडुरंग दाढे (२९, रा. वाफळे जि. सोलापूर), शरद बाळू दाढे (२५ रा. वाफळे, जि. सोलापूर) असे संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून टाटा सुमो गाडी जप्त करण्यात आली.
विठ्ठल विजयसिंग जारवाल (रा. राजेवाडी ता. बदनापूर) हा १४ जानेवारी २०२१ रोजी सकाळी साडेअकर वाजता आपल्या मित्रासोबत जालना येथील बसस्थानकात उभा होता. तेव्हाच नऊ जणांनी त्याला मारहाण करून गाडीत बसवले. त्यानंतर त्याला आरोपी गाडीत घेऊन गेले. या प्रकरणी तरूणाच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी बसस्थानकातील सीसीटीव्ही तपासून गाडीचा क्रमांक काढला. अपहरणकर्ते अंबड, पैठण, शेगाव मार्गे जात असल्याची माहिती मिळाल्याने सातारा कोल्हापूरकडे पथके रवाना करण्यात आली होती. पोनि. देशमुख यांनी अहमदनगर, सातारा, कोल्हापूर येथील नियंत्रण कक्षास कळविले होते. सातारा पोलिसांनी संबंधित युवकांचे फोन नंबर ट्रेस करून अपहरण झालेल्या युवकाची सुटका केली. यावेळी नऊ आरोपींना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलीस अधीक्षक सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. संजय देशमुख, कर्मचारी कैलास खार्डे, समाधान तेलंग्रे, फुलचंद गव्हाणे, सुधीर वाघमारे, योगेश पठाडे यांनी केली.
नोकरीचे आमिष देऊन केली फसवणूक दरम्यान, विठ्ठल जारवाल याने सातारा येथील तरुणांना नोकरीचे आमिष देऊन फसवल्याने हा प्रकार घडल्याचे पुढे आले आहे. काही दिवसांपूर्वी विठ्ठल सातारा येथे गेला असता त्याने आपली मंत्र्यांसोबत ओळख असल्याची बतावणी करून तरुणांना नोकरीचे आमिष दिले. बेरोजगार तरुणांनी आमिषाला बळी पडत त्याला रोख रक्कम दिली. बरेच दिवस झाले तरी नोकरीबद्दल काहीच हाती लागत नसल्याने तरुणांनी विठ्ठलकडे पैस्यांची मागणी केली. त्याने चालढकल केल्याने संतप्त तरुणांनी जालन्यात येऊन विठ्ठलचे अपहरण केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.