चौपदरीकरण रखडले
By Admin | Updated: July 7, 2014 00:15 IST2014-07-06T23:34:57+5:302014-07-07T00:15:49+5:30
शेवगा: अंबड - जालना या रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या प्रस्ताव अद्यापही ‘लालफितीत’ असून त्यामुळे या रस्त्याचे काम रखडले आहे.

चौपदरीकरण रखडले
शेवगा: अंबड - जालना या रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या प्रस्ताव अद्यापही ‘लालफितीत’ असून त्यामुळे या रस्त्याचे काम रखडले आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे या मार्गावर सतत अपघातांच्या घटना घडत आहेत.
जालना-अंबड हा रस्ता अत्यंत वर्दळीचा आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून हा रस्ता अरूंद असल्याने येथे अपघातांच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. विशेष म्हणजे तीन वर्षांपूर्वी शेगावच्या दिंडीचा अपघात याच मार्गावर झाला होता. त्यात अकरा वारकरी ठार झाले होते. या घटनेनंतर राज्य शासनाने या रस्त्याचे चौपदरीकरण करण्याची घोषणा केली होती. या रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे येथून वाहतूक करणे कठीण होऊन बसले आहे.
शेवगा परिसरातील रस्त्याची अवस्था फार बिकट बनली असून. रस्त्याच्या दोन्ही बाजूचे पंखे पूर्णपणे खराब झालेली आहेत. अंबड- जालना रस्ता चौपदरीकरण करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे. तसेच या रस्त्यावर अनेक छोटी-मोठी गावे येत असल्याने ग्रामस्थांना तालुक्याच्या ठिकाणी जाण्याकरिता हा एकमेव रस्ता आहे.
या रस्त्याचे चौपदरीकरण झाल्यास अपघातांचे प्रमाण कमी होऊ शकतील. मात्र रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्यात येत असल्याने जालना आणि अंबड दोन्ही विभागांकडून दुर्लक्ष होत आहे. शिवाय हा रस्ता जेमतेम ३० कि़मी. आहे. तरीही याकडे कोणीही लक्ष देत नसल्याने काही दिवसांत हा रस्ता पूर्णत: उखडून जाण्याची भीती वर्तविली जात आहे.
काही महिन्यांपूर्वी बांधकाम विभागाने या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम केले होते. मात्र काही दिवसांतच ते खड्डे ‘जैसे थे’ बनले आहेत.
त्यामुळे या रस्त्याचे संपूर्ण चौपदरीकरण करण्याची गरज निर्माण झाली आहे. या रस्त्यालगत असणाऱ्या गावातील लोकांची दैनंदिन कामाची व्यवस्था या रस्त्यावरच अवलंबून आहे. ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांनाही तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी या रस्त्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे हा प्रश्न कायम निकाली काढावा, अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत. (वार्ताहर)
चौपदरीकरण आवश्यक
शहराकडे जाण्यासाठी हा एकमेव मुख्य रस्ता असल्याने ग्रामस्थांना या रस्त्याशिवाय दुसरा पर्याय नाही.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही दैनंदिन या रस्त्यावरूनच प्रवास करावा लागत आहे. या रस्त्यावर दैनंदिन प्रवाशांची संख्या वाढतच आहे