२२ लाख लोकांची अन्न सुरक्षा वाऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:28 IST2021-01-18T04:28:07+5:302021-01-18T04:28:07+5:30
अन्न व औषध प्रशासनाकडे मोठी जबाबदारी असते. या विभागातर्फे नागरिकांना योग्य अन्न, औषधी मिळाव्यात, यासाठी दरवर्षी हाॅटेल, मेडिकल्सची ...

२२ लाख लोकांची अन्न सुरक्षा वाऱ्यावर
अन्न व औषध प्रशासनाकडे मोठी जबाबदारी असते. या विभागातर्फे नागरिकांना योग्य अन्न, औषधी मिळाव्यात, यासाठी दरवर्षी हाॅटेल, मेडिकल्सची तपासणी केली जाते, परंतु जालना येथील अन्न व औषध प्रशासनाकडे अत्यंत कमी मनुष्यबळ असल्याने तपासणीकडे कानाडोळा केला जातो. येथील अन्न व औषध विभागात औषध निरीक्षकाची २ पदे मंजूर आहेत. त्यापैकी केवळ १ पद भरण्यात आले आहे. अन्न निरीक्षकाची ४ पदे मंजूर असून, तीन पदे भरण्यात आली आहेत. न्यायालयात गेल्या प्रकरणासाठी आठवड्यातून किमान दोन दिवसांचा कालावधी लागतो, तरीही येथील अधिकारी दरवर्षी होटल, मेडिकल्सची तपासणी करतात.
कोर्ट-कचेऱ्या करण्यातच वेळ जातो
अन्न व औषध प्रशासनाचे ४० प्रकरणे न्यायलयात दाखल आहेत. एका प्रकरणासाठी एका कर्मचाऱ्याला आठवड्यातून एक दिवस द्यावा लागतो. त्यामुळे यातच वेळ जातो. शासनाने अन्न व औषध प्रशासन विभागात रिक्त असलेली पदे भरावी, अशी मागणी होत आहे.
चौकट
१३ हॉटेल चालकांना नोटिसा
जालना जिल्ह्यात १९७ हॉटेल आहेत. या हॉटेलसची वर्षांतून एकदा तपासणी केली जाते. यंदा डिसेंबर महिन्यात तपासणी करण्यात आली होती. यात जवळपास १३ हॉटेल चालकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात अन्न निरीक्षकांची ४ पदे मंजूर असून, ३ पदे भरलेली आहेत.
चौकट
वर्षांतून एकदा मेडिकल्सची तपासणी
येथील अन्न व औषध प्रशासन विभागात दोन औषध निरीक्षकांची पदे मंजूर असून, केवळ एक पद भरलेले आहे. जिल्ह्यात १,३०० मेडिकल्स आहे. या मेडिकल्सची वर्षांतून एकदाच तपासणी केली जाते. ग्रामीण भागात तर तपासणीकडे कोनाडोळा केला जात असल्याचे दिसून येत आहे. गतवर्षी नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या ७२ मेडिकल्स चालकांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.