सावकाराने बळकावली शेतकऱ्यांची शेतजमीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:59 IST2021-02-05T07:59:37+5:302021-02-05T07:59:37+5:30
जालना : व्याजाने पैसे देऊन शेतकऱ्याची जमीन बळकावल्याची घटना बदनापूर तालुक्यातील आन्वी येथे घडली. या प्रकरणी लिंबा वाच्छू जाधव ...

सावकाराने बळकावली शेतकऱ्यांची शेतजमीन
जालना : व्याजाने पैसे देऊन शेतकऱ्याची जमीन बळकावल्याची घटना बदनापूर तालुक्यातील आन्वी येथे घडली. या प्रकरणी लिंबा वाच्छू जाधव यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी जनार्दन कोंडीबा म्हस्के (रा. आन्वी) याच्याविरुद्ध चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
परिस्थिती नाजूक असल्याने फिर्यादीचे वडील वाच्छू जाधव यांनी गावातील सावकार जनार्दन म्हस्के यांच्याकडून १९ ऑक्टोबर २०११ रोजी एक लाख रुपये ५ रुपये शेकड्याने घेतले होते. त्या मोबदल्यात त्यांनी ६० आर जमिनीचे खरेदीखत करून दिले होते. त्यावेळी पैसे दिल्यानंतर जमीन परत दिली जाईल, असे आश्वासन म्हस्के यांनी दिले. काही दिवसांनी वाच्छू जाधव यांच्या परिस्थितीत सुधारणा झाली. त्यानंतर फिर्यादीने जनार्दन म्हस्के यांना साक्षीदार शेषराव राठोड (रा. कंडारी तांडा) व फिर्यादीची पत्नी कमलबाई लिंबा जाधव यांच्यासमक्ष घेतलेले एक लाख रुपये व पाच रुपये शेकड्याने झालेले व्याज असे एकूण ३ लाख २१ हजार ९९० रुपये दिले. त्यानंतर फिर्यादीने सावकाराकडे जमिनीची मागणी केली. परंतु, म्हस्के याने जमीन देण्यास टाळाटाळ केली. याबाबत जिल्हा निबंधक कार्यालयाकडे तक्रार करण्यात आली. जिल्हा निबंधकांनी दुय्यम निबंधक, बदनापूर यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. परंतु, त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. या प्रकरणी शनिवारी रात्री चंदनझिरा पोलीस ठाण्यात जनार्दन म्हस्के याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.