श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:30 IST2021-09-03T04:30:37+5:302021-09-03T04:30:37+5:30
रामनगर परिसरातील पिकांचे मोठे नुकसान जालना : तालुक्यातील रामनगर व परिसरात गत दोन दिवस दमदार पाऊस झाला. या ...

श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह
रामनगर परिसरातील पिकांचे मोठे नुकसान
जालना : तालुक्यातील रामनगर व परिसरात गत दोन दिवस दमदार पाऊस झाला. या पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या खरिपातील पिकांना मोठा फटका बसला आहे. त्याशिवाय फळबागांचेही अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे प्रशासनाने पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी या भागातील शेतकरी करीत आहेत.
जाफराबाद येथे पोषण आहार पंधरवाडा
जाफराबाद : येथील एकात्मिक बाल विकास प्रकल्पांतर्गंत जाफराबाद शहरातील अंगणवाड्यांमध्ये पोषण आहार पंधरवडा उपक्रमाची सुरूवात बुधवारी करण्यात आली. दरम्यान, पर्यवेक्षिका शारदा गोफणे यांनी बालकांना, गरोदर मातांना अंगणवाडी अंतर्गत देण्यात येत असलेल्या सकस आहाराबाबत माहिती दिली. यावेळी अंगणवाडी सेविका रेखा केदारे, कविता मंडलिक, पंचशिला पांडव, नसीमा पठाण, रत्नप्रभा मगरे, सुनीता सुरडकर, सुनीता गायकवाड आदींची उपस्थिती होती.
चंद्रसेन कोठावळे यांचा सत्कार
अंबड : शहरातील मत्स्योदरी महाविद्यालयातील वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. चंद्रसेन कोठावळे यांची घनसावंगी येथील मॉडर्न कॉलेजच्या प्राचार्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबद्दल पालकमंत्री राजेश टोपे, सचिव मनीषा टोपे, प्राचार्य डॉ. भागवत कटारे, प्रशासकीय अधिकारी डॉ. बाबासाहेब गायकवाड, डॉ. राजेंद्र गायकवाड, अंबडचे प्राचार्य डॉ. शिवशंकर घुमरे आदींनी स्वागत केले आहे.
पिंपळगाव परिसरात पिके बहरली
भोकरदन : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथे गेल्या चार दिवसांपासून जोरदार पावसाची हजेरी सुरू आहे. त्यातच बुधवारी सकाळपासूनच परिसरामध्ये ढगाळ वातावरण होते. अधून-मधून पावसाच्या हलक्या श्रावण सरी कोसळत होत्या. त्यामुळे परिसरातील वातावरण निसर्गरम्य होऊन वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला होता.
मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्ताची मागणी
जालना : भोकरदन तालुक्यातील रामनगर येथे मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला आहे. तसेच पिसाळलेल्या कुत्र्यांमुळे ही ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गावातील नागरिकांसह जनावरांनाही या कुत्र्याने चावा घेतला आहे. त्यामुळे मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
अवैध प्रवासी वाहतूक थांबविण्याची मागणी
अंबड : शहरासह ग्रामीण भागात अनेक वाहन चालक अवैध प्रवासी वाहतूक करीत आहेत. अनेक चालक क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करीत आहेत. वाढलेले रस्ता अपघात पाहता पोलीस प्रशासन, उपप्रादेशिक परिवहन विभागाने याकडे लक्ष देऊन अवैध प्रवासी वाहतूक थांबवावी, अशी मागणी होत आहे.