श्रावण महिन्यातही मंदिर बंदचा मोठा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:04 IST2021-09-02T05:04:57+5:302021-09-02T05:04:57+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : कोरोनाचे कारण पुढे करत राज्यातील मंदिरे बंद आहेत. यामुळे मंदिरावर अवलंबून असलेल्या व्यापारी तसेच ...

Even in the month of Shravan, the temple closure is a big blow | श्रावण महिन्यातही मंदिर बंदचा मोठा फटका

श्रावण महिन्यातही मंदिर बंदचा मोठा फटका

लोकमत न्यूज नेटवर्क

जालना : कोरोनाचे कारण पुढे करत राज्यातील मंदिरे बंद आहेत. यामुळे मंदिरावर अवलंबून असलेल्या व्यापारी तसेच पुजारी आणि एकूणच गावातील उलाढालीवर याचा परिणाम झाला आहे.

गेल्या दोन वर्षांपासून मंदिरे बंद आहेत. उलाढालीप्रमाणेच भाविकांच्या भावनेचा विचार सरकारकडून केला जात नाही. सर्व व्यवहार अनलॉक झाले आहेत. असे असताना केवळ मंदिरे बंद ठेवून कोरोनाचा फैलाव रोखता येईल, हा समज सरकारने करून घेतला आहे. परंतु त्यात तथ्य नसल्याचा आरोप भाविकांकडून केला जात आहे.

अन्य राज्यांमध्ये सर्वधर्मियांची प्रार्थनास्थळे सुरू आहेत. केवळ महाराष्ट्रातच मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय कुठल्या हेतूने घेतला जात आहे, असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे. बाजारातील गर्दी नियंत्रणात आणण्यात सरकार पूर्णत: अपयशी ठरले आहे. आता तर कोरोना रुग्णसंख्या घटल्याने मास्क, सुरक्षित अंतराच्या नियमांकडेही दुर्लक्ष होत आहे.

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठीच सरकारचा निर्णय -शिवसेना

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दूरदृष्टीचे नेते आहेत. केवळ भावनेच्या आहारी जाऊन ते निर्णय घेत नाहीत. यामुळे कोरोना पसरू नये, हाच त्यांचा उद्देश असल्याची माहिती जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर यांनी दिली.

कोरोनानंतरच मंदिरे उघडावीत -कॉंग्रेस

कोरोनाची रुग्णसंख्या आता हळूहळू कमी होत आहे. ही सकारात्मक बाब आहे. त्यामुळे मंदिरे बंद ठेवणे हा सरकारचा हेतू नाही. परंतु कोरोनाचा पूर्ण नायनाट झाल्यावरच मंदिरे उघडल्यास लाभ होईल, असे शहराध्यक्ष शेख महेमूद यांनी सांगितले.

भावनांना महत्त्व

देऊ नये -राष्ट्रवादी

मंदिरांमध्ये यात्रा तसेच दर्शनासाठी हजारो भाविक येतात. त्यावेळी कोरोना नियमांचे उल्लंघन होते. यातूनच जर कोरोना पुन्हा पसरल्यास गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे भावनेच्या आहारी जाऊ नये, असे डॉ. निसार देशमुख म्हणाले.

मंदिरे उघडावीत -भाजप

मंदिरे ठेवण्यात येत आहेत. याचा मोठा फटका मंदिर व्यवस्थापनासह त्या गावातील उलाढालीवर झाला आहे. सर्वकाही अनलॉक केले आहे. मग केवळ मंदिरेच बंद का, याचे उत्तर सरकारकडून समाधानकारक दिले जात नसल्याचे शहराध्यक्ष राजेश राऊत यांनी सांगितले.

लाखोंची उलाढाल ठप्प

मंदिरे बंद असल्याने मंदिराचे व्यवस्थापन कोलमडले आहे. तसेच भक्तांच्या दर्शनामुळे देणगी रूपातून मिळणारे उत्पन्न घटले आहे.

श्रावण तसेच अन्य महत्त्वाच्या सणांमध्येही मंदिरे बंद असल्याने लाखो रुपयांच्या देणगीवर पाणी सोडावे लागले आहे. तसेच लाखोंच्या व्यवहारही थंडावला आहे.

राजूर गणपती हे भक्तांचे दैवत आहे. परंतु गेल्या दोन वर्षांपासून संस्थान बंद आहे. त्याचा परिणाम मंदिराच्या उत्पन्नावर झाला आहे. त्यामुळे मंदिर सुरू झाल्यास पुन्हा उत्पन्नात वाढ होईल.

- गणेश साबळे, राजूर

मंदिरे बंद ठेवून कोरोना जाईल, हा एक चुकीचा समज आहे. सर्व बाजारपेठ, दुकाने, हॉटेल सुरू आहेत. मग मंदिरेच बंद का हा संशोधनाचा विषय आहे. मंदिरे सुरू होणे हीच आमची प्रमुख मागणी आहे.

- आचार्य रामदास महाराज

Web Title: Even in the month of Shravan, the temple closure is a big blow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.