शहरातील स्वयंचलित सिग्नल व्यवस्थेला बंदचे ग्रहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:32 IST2021-02-24T04:32:37+5:302021-02-24T04:32:37+5:30
जालना शहरात वाढती वाहनांची संख्या ही शहर वाहतुकीसाठी डोकेदुखी ठरत आहे. पार्किंगची व्यवस्था नसल्याने अर्धे रस्ते वाहनांच्या उभ्या करण्याने ...

शहरातील स्वयंचलित सिग्नल व्यवस्थेला बंदचे ग्रहण
जालना शहरात वाढती वाहनांची संख्या ही शहर वाहतुकीसाठी डोकेदुखी ठरत आहे. पार्किंगची व्यवस्था नसल्याने अर्धे रस्ते वाहनांच्या उभ्या करण्याने व्यापत आहेत. जालना पालिका आणि शहर वाहतूक शाखा यांनी या स्वयंचलित सिग्नल व्यवस्थेसाठी प्रयत्न केले. शहरातील मुथा बिल्डींग, शनिमंदिर चौक, मामा चौक यासह अन्य काही चौकांमध्ये लाखो रूपये खर्च करून ही यंत्रणा उभी केली होती.
परंतु काही दिवस ही यंत्रणा सुरू झाल्यावर नागरिकांनी देखील समाधान व्यक्त केले होते. परंतु नंतर वीज बिलासह अरूंद रस्त्यांमुळे ही यंत्रणा बंद पडली आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून हे सिग्नल केवळ शोभेची वस्तू म्हणून उभे आहेत. सिग्नल सुरू झाल्यानंतरही वाहतुकीची समस्या कायम असून, शहरातील अनेक भागात एकेरी वाहतुकीसाठी रस्ते नसल्याने ही समस्या आणखी गंभीर बनली आहे.
एकेरी वाहतुकीचा रस्ता अवघड
जालना शहरातील पाणी वेस परिसरात एकेरी वाहतूक व्यवस्था ही दाेन वर्षांपासून अंमलात आणली होती. तत्कालीन पोलीस अधीक्षक जय जाधव यांनी स्वत: शहरात फिरून पाणी वेशीतून शिवाजी महाराज चौकाकडून येणाऱ्यांनाच प्राधान्य दिले होते. नागरिकांना रामनगर अथवा शिवाजी पुतळा परिसरात जायचे झाल्यास पाणी वेशीच्या उजव्या बाजूने राजमहल चित्रपटगृहाजवळून मंगळवार बाजार तसेच ओम हॉस्पिटलकडे हा रस्ता निघतो. परंतु हा रस्ता अत्यंत अरूंद आणि खड्डेमय असल्याने या मार्गावरून जाण्यास वाहन चालक धजावत नाहीत. त्यामुळे पालिकेने हा रस्ता मजबूत करावा अशी मागणी होत आहे.