दररोज धोकादायक कसरती!
By Admin | Updated: May 6, 2014 12:12 IST2014-05-06T11:54:35+5:302014-05-06T12:12:13+5:30
रेल्वे उड्डाणपूल : चिमुकल्यांपासून महिला ओलांडताहेत रूळ

दररोज धोकादायक कसरती!
जालना : उड्डाणपुलाजवळील वसाहतीतील मुलाबाळांसह महिला व नागरिक दैनंदिन कामांसाठी रेल्वे गेटचा वापर करण्याऐवजी थेट रेल्वे मार्ग ओलांडण्याच्या जीवघेण्या कसरती करू लागले आहेत. रेल्वेस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणावर वसाहती स्थिरावल्या आहेत. विशेषत: रेल्वे स्थानकाच्या पलिकडील बाजुस आनंद नगर, बँक कॉलनी, जमुना नगर, विद्युत कॉलनी, एस.बी. कॉलनी वगैरे कॉलन्या लगतच स्थिरावल्या आहेत. येथील हजारो नागरिकांना जुना किंवा नवीन जालन्यात कामानिमित्त ये-जा करण्याकरीता रेल्वे मार्ग ओलांडल्याशिवाय पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे हे नागरिक प्लॅटफॉर्म लगतच्या रेल्वे गेटचा वापर करीत आहेत. परंतु रेल्वे उड्डाणपुलाजवळील मंमादेवी नगर, कांचन नगर, शिवनगर, आनंदवाडी, राहूल नगर आदी अगदी रेल्वे मार्गालगतच विसावलेल्या वसाहतींमधील नागरिक उड्डाणपुला लगतच रेल्वेगेट असतांनासुद्धा ते गेट वापरण्याऐवजी उड्डाणपुलाखालील थेट रेल्वेमार्गच ओलांडण्याच्या जीवघेण्या कसरती करत आहेत. जालना ते औरंगाबाद या रेल्वेमार्गावर दररोज पॅसेंजर, एक्सप्रेस किंवा मालवाहू वगैरे ५० गाड्या धावतात. त्यामुळे हे दोन्ही रेल्वे गेट वाहतुकीसाठी वारंवार बंद करावे लागते. त्यामुळेच हे दोन्ही गेट खुले होण्याची प्रतीक्षा न करताच या परिसरातील नागरिक मोकळ्या जागेतून थेट रेल्वे रूळ ओलांडूनच ये-जा करू लागले आहेत. चिमुकल्यांपासून ते शालेय विद्यार्थी दररोज रेल्वे रूळ ओलांडून ये-जा करीत आहत. विद्यार्थीनीसुद्धा सायकल किंवा वाहने हे रूळ ओलांडून पुढे नेत आहेत. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या या दररोजच्या कसरती धोकादायक ठरू लागल्या आहेत. यातच आता महिलांनीसुद्धा आघाडी घेतली आहे. पिण्याचे पाणी आणण्यासह कपडे धुण्याच्या निमित्ताने महिलाही सर्रास रेल्वे रूळ ओलांडून ये-जा करू लागल्या आहेत. वर्षानुवर्षापासून हे धोकादायक प्रकार सुरू असतांनासुद्धा त्याचे कोणालाही सोयरसुतक नाही, हे विशेष आहे. (प्रतिनिधी)
घटनेचा काहीही परिणाम नाही
४गेल्या पंधरा दिवसापूर्वी रेल्वे मार्गाजवळ खेळणार्या एका चिमुकल्यास गाडी येत असल्याचेभान राहिले नाही. गाडी दिसली तेव्हा त्याने जिवाच्या आकांताने रूळ ओलांडण्याचा प्रयत्न केला. परंतु पाय अडकल्याने तो गाडीखाली सापडला. त्यात त्याचा नाहक बळी गेला. या खळबळजनक घटनेपासून घबराट पसरली आहे. परंतु, त्यातून कुणीही बोध घेतला नाही.
४उड्डाणपुलाजवळील या रेल्वेमार्गाजवळ लोखंडी गेटचे कुंपन उभारणे गरजेचे आहे. गेटजवळ कठडे बसविण्यात आले आहेत. परंतु काही ठिकाणी मोकळी जागा आहे. त्याचाच उपयोग हे नागरिक ये-जा करण्यासाठी करू लागले आहेत.