पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:30 IST2021-09-03T04:30:35+5:302021-09-03T04:30:35+5:30
मल्लांना मिळाली सात सुवर्णपदके जालना : जालना तालुक्यातील रामनगर येथील गुणवंत व्यायामशाळेच्या मल्लांनी सोलापूर येथे नुकत्याच पार पडलेल्या ...

पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर गर्दी
मल्लांना मिळाली सात सुवर्णपदके
जालना : जालना तालुक्यातील रामनगर येथील गुणवंत व्यायामशाळेच्या मल्लांनी सोलापूर येथे नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य ग्रॅपलिंग कुस्ती चॅम्पियनशिप २०२१ स्पर्धेत तब्बल सात सुवर्ण पदके मिळविली. यामध्ये ८४ किलो वजन गटात सुवर्णपदक विजेते पहिलवान सुरेश ज्ञानेश्वर यज्ञेकर -जोशी, ५९ किलो वजन गटात सुवर्णपदक पहिलवान पृथ्वीराज रमेश यज्ञेकर-जोशी, ९२ किलो वजन गटात सुवर्णपदक पहिलवान बाबासाहेब चव्हाण, ८४ किलो वजन गटात सुवर्णपदक पहिलवान आदित्य कांबळे यांचा समावेश आहे.
रोहित्र दुरुस्त करून मिळेना
जालना : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कन्हैयानगर येथे शेतकरी संघटनेच्या वतीने बुधवारी रोहित्रांच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन करून अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला. सध्या शेतकऱ्यांचा सिजन नसतानाही रोहित्रासाठी महिना महिना वाट पाहावी लागत आहे. हा प्रकार वेळीच थांबवा; अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
सूचना फलक गायब, चालकांची गैरसोय
भोकरदन : तालुक्याचे ठिकाण असलेल्या भोकरदन शहराला जोडणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यातच या रस्त्यांवरील सूचना फलक, दिशादर्शक फलक गायब झाले आहेत. त्यामुळे वाहन चालकांसह प्रवाशांची गैरसोय होत आहे. बांधकाम विभागाने गरजेनुसार सूचना, दिशादर्शक फलक लावावेत, अशी मागणी होत आहे.
शस्त्रक्रियेसाठी रुग्ण पुण्याकडे रवाना
राणी उंचेगाव : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या पुढाकारातून समता फाउंडेशनच्या वतीने राणी उंचेगाव येथे मोतीबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यातील मोतीबिंदू निघालेल्या राणी उंचेगावसह परिसरातील ग्रामस्थांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी बुधवारी पुणे येथे पाठविण्यात आले. या वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक बालासाहेब शिंदे, सरपंच विठ्ठल खैरे, उद्धव माने, दत्ता राऊत, कृष्णा काटे, राजू राऊत, खेमा कामठे यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.
परतूरला रस्त्यावर जनावरांचा ठिय्या
परतूर : शहरातील मुख्य रस्त्यावर मोकाट जनावरे दिवसरात्र ठिय्या मांडत आहेत. त्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. परतूर शहरातील पालिकेचा कोंडवाडा शोभेची वस्तू बनला आहे. मुख्य रस्त्यावर मोकाट जनावरे बसत असल्याने वाहतुकीला अडथळा येतो. अनेकदा ठिकठिकाणी वाहतूक ठप्प होत आहे.
धनगरपिंपरी मंडळात पिके धोक्यात
अंबड : तालुक्यातील धनगरपिंपरी मंडळात मंगळवारी पहाटे जोरदार पाऊस पडला. त्यामुळे शेतशिवारातील पिकांना फटका बसला आहे. शेतात पाणी साचल्याने पिकेही धोक्यात आली आहेत. पिकांना केलेला खर्च आता वसूल होणे कठीण होऊन बसले आहे. कृषी व महसूल विभागाच्या वतीने तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे.