पिके धोक्यात, जनावरांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:27 IST2021-02-15T04:27:15+5:302021-02-15T04:27:15+5:30
माहोरा : वीज कंपनीने थकीत वीजबिलाच्या वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित केला आहे. कृषी पंपांचा वीजपुरवठा खंडित झाल्याने रब्बीतील पिके धोक्यात ...

पिके धोक्यात, जनावरांचे हाल
माहोरा : वीज कंपनीने थकीत वीजबिलाच्या वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित केला आहे. कृषी पंपांचा वीजपुरवठा खंडित झाल्याने रब्बीतील पिके धोक्यात आली असून, जनावरांचेही पाण्याअभावी हाल होत आहेत. खंडित वीजपुरवठा पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी महावितरण विरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
जाफराबाद तालुक्यातील माहोरा जिल्हा परिषद सर्कलमधील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. रोहित्र बंद करण्यात आल्याने गत चार दिवसांपासून पिकांना पाणी देणे बंद झाले आहे. याशिवाय शेतातील जनावरांचेही पाण्यावाचून हाल होत आहेत. माहोरा येथील वीज वितरण कार्यालयांतर्गत माहोऱ्यासह आसई, कड पिंपळगांव, वरूड खुर्द, भोरखेडा, कोल्हापूर, वडाळा, म्हसरूळ, घानखेडा, कोळेगांव, वालसा (वडाळा), कोठा, चापनेर, धोनखेडा, बेलोरा, जानेफळ, चिंचखेडा, येवता, बोरगाव, सवासणी, खासगांव, विरखेडा भालकी आदी गावांच्या शिवारातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. हा वीजुरवठा तत्काळ पूर्ववत सुरू करावा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कृउबाचे सभापती भाऊसाहेब जाधव, पंचायत समितीचे सभापती दगडुबा गोरे, डॉ. रवींद्र कासोद, गजानन लहाने, अण्णा इंगळे, विजय बोराडे, गणेश पोपळघट आदींनी निवेदनाद्वारे दिला आहे.
कोट
शासनाने कृषीची विजबिले भरण्यासाठी योजना लागू केली आहे. या योजनेनुसार ५० टक्के थकीत बिल भरले तर उर्वरित बिल माफ होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी थकीत वीजबिल भरून शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन वीज वितरणचे कर्मचारी गजानन जाधव यांनी केले आहे.