अंबड नगरपालिकेत भाजपच्या पाठिंब्यावर काँग्रेसचा उपनगराध्यक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:33 IST2021-02-09T04:33:52+5:302021-02-09T04:33:52+5:30
अंबड : देशपातळीवर काँग्रेस व भाजप यांच्यातून विस्तव जात नाही. शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरून दोन्ही पक्षांमध्ये सध्या संसदेत जोरदार रणकंदन ...

अंबड नगरपालिकेत भाजपच्या पाठिंब्यावर काँग्रेसचा उपनगराध्यक्ष
अंबड : देशपातळीवर काँग्रेस व भाजप यांच्यातून विस्तव जात नाही. शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरून दोन्ही पक्षांमध्ये सध्या संसदेत जोरदार रणकंदन सुरू आहे. असे असतानाही सोमवारी अंबड नगरपालिकेच्या सभागृहात पार पडलेल्या निवडणुकीत भाजपच्या पाठिंब्यावर काँग्रेसचा उमेदवार उपनगराध्यक्षपदी विराजमान झाला.
अंबड पालिकेतील काँग्रेसचे नेते केदार बाबूराव कुलकर्णी यांनी ६ जानेवारी रोजी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. नवीन उपनगराध्यक्ष निवडीसाठी सोमवारी पीठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल व सहायक अधिकारी तथा तहसीलदार विद्याचरण कडवकर यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया पार पडली. विशेष म्हणजे ही निवडणूक महाविकास आघाडीतील दोन प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये झाली. उपनगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसतर्फे शेख जाकेर शेख मकबूल व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आसमाँ परवीन अफरोज पठाण यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यात शेख जाकेर शेख मकबूल यांना १२, तर आसमाँ परवीन अफरोज पठाण यांना ५ मते मिळाली. अंबड नगरपालिकेत सध्या एकूण १९ नगरसेवक असून, त्यामध्ये भाजपचे ६, काँग्रेसचे ५, राष्ट्रवादी काँग्रेसचे ५, राष्ट्रीय समाज पक्षाचे २ व शिवसेनेचा १ असे पक्षीय बलाबल आहे. यापैकी दोनपेक्षा जास्त अपत्य असल्याचा आक्षेप शासनदरबारी दाखल असल्यामुळे भाजपच्या दोन नगरसेवकांना मतदान करण्यास मनाई करण्यात आली होती, तर शिवसेनेच्या संजीवनी हनुमान धांडे या मतदानास गैरहजर राहिल्या. १६ नगरसेवक व १ नगराध्यक्ष असे एकूण १७ जणांनी मतदान केले. काँग्रेसच्या शेख जाकेर शेख मकबूल यांना काँग्रेसचे ५, भाजपचे ४, राष्ट्रीय समाज पक्षाचे २ व भाजपच्या नगराध्यक्षा संगीता देविदास कुचे यांचे १ अशी एकूण १२ मते मिळाली, तर आसमाँ परवीन अफरोज पठाण यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५ सदस्यांची मते मिळाली.
निवडणुकीनंतर वातावरण तापले
निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते शिवप्रसाद चांगले यांनी काँग्रेसवर टीका करताना राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना काँग्रेसने आघाडी धर्माचे पालन करणे आवश्यक होते. मात्र, त्यांनी धर्मनिरपेक्ष पक्षांची साथ सोडून भाजपशी अभद्र आघाडी केल्याचा आरोप केला. त्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली.