पाणी पुरवठा योजनेची कामे वेळेत पूर्ण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:29 IST2021-02-14T04:29:08+5:302021-02-14T04:29:08+5:30
जालना : जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन अंतर्गत सुरू असलेल्या योजनांची कामे तत्काळ पूर्ण करावीत, पाणी पुरवठा योजनेपासून एकही ...

पाणी पुरवठा योजनेची कामे वेळेत पूर्ण करा
जालना : जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन अंतर्गत सुरू असलेल्या योजनांची कामे तत्काळ पूर्ण करावीत, पाणी पुरवठा योजनेपासून एकही गाव वंचित राहू नये, अशा सूचना पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी टोपे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनची बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार राजेश राठोड, अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे, पाणी पुरवठा जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता डी.एच. डाकोरे, कल्याण सपाटे व संबंधित अधिकारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्र्यांनी जिल्हा परिषद पाणी पुरवठा योजनेच्या अधिकारी व कर्मचारी, गट विकास अधिकारी, अभियंते, ग्रामसेवक, सरपंच यांची समिती नेमून सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या, तसेच एकही गाव पाणी पुरवठा योजनेपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. शासनाचा जल जीवन मिशन आराखडा या बैठकीत जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंत्यांनी आराखडा सादर केला. आराखड्यात प्रगती पथावर असलेल्या व प्रस्तावित अशा ९५१ गावांचा समावेश आहे. आराखडा हा ६३४ गावांचा असून, किंमत ३३५.५८ कोटी रुपयांचा हा आराखडा प्रस्तावित आहे. सर्व गावांना, सर्व घरांना ५५ लिटर दरडोई पाणी देण्यात येणार असून, प्रगती पथावर असलेल्या ३१७ ( यामध्ये २ ग्रीड योजनांचा समावेश आहे.) गावासाठी ५५० काेटींची तरतूद असल्याचे सांगण्यात आले.