ढगाळ वातावरणामुळे रब्बीतील पिके धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:23 IST2021-01-10T04:23:24+5:302021-01-10T04:23:24+5:30
आन्वा : भोकरदन तालुक्यातील आन्वा व वाकडी परिसरात सतत ढगाळ वातावरण तयार होत आहे. ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील हरभऱ्यासह ...

ढगाळ वातावरणामुळे रब्बीतील पिके धोक्यात
आन्वा : भोकरदन तालुक्यातील आन्वा व वाकडी परिसरात सतत ढगाळ वातावरण तयार होत आहे. ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील हरभऱ्यासह इतर पिकांवर अळ्यांसह रोगराईचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
गतवर्षी जोरदार पाऊस झाल्याने खरिपातील पिके वाया गेली. अनेकांना या नुकसानाचे अनुदान अद्यापही मिळालेले नाही. पीककर्जही वेळेत न मिळाल्याने शेतकऱ्यांनी उसनवारी, सावकाराकडील कर्ज घेऊन रब्बी हंगामातील पिकांचा पेरा केला. शेतकऱ्यांना यंदा या हंगामातून चांगले उत्पन्न मिळेल, अशी आशा होती. मात्र, सततच्या ढगाळ वातावरणामुळे गहू, हरभरा आदी पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव झाला आहे. खराब हवामानामुळे खरिपापाठोपाठ रब्बी हंगामही वाया जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. त्यात अवकाळी पाऊस किंवा गारपीट झाली तर अतोनात नुकसान होण्याची भीतीही वर्तविली जात आहे. कीडरोग नियंत्रणात आणण्यासाठी शेतकरी महागड्या औषधांची फवारणी करत आहेत. कृषी विभागाने याकडे तातडीने लक्ष देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे.
सध्या विहिरींमध्ये मुबलक पाणीसाठा आहे. आम्ही नियोजन करून हरभऱ्याचा पेरा केला आहे. परंतु, ढगाळ वातावरणामुळे २५ एकरावरील हरभरा वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. हरभऱ्यावर अळीचा प्रादुर्भाव वाढत असून, कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची गरज असल्याचे देवराव पांडव, उपसरपंच अमरजीत देशमुख यांनी सांगितले.