मुख्यमंत्र्यांची आंदोलनाकडे पाठ, आंदोलनकर्ते नाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:27 IST2021-02-08T04:27:25+5:302021-02-08T04:27:25+5:30
महाकाळा (अंकुशनगर) - मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मागील १९ दिवसांपासून अंबड तालुक्यातील साष्टपिंपळगाव येथे राज्यव्यापी ठिय्या आंदोलन ...

मुख्यमंत्र्यांची आंदोलनाकडे पाठ, आंदोलनकर्ते नाराज
महाकाळा (अंकुशनगर) - मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मागील १९ दिवसांपासून अंबड तालुक्यातील साष्टपिंपळगाव येथे राज्यव्यापी ठिय्या आंदोलन सुरू आहे. त्यातच दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे औरंगाबाद येथे येऊन गेले. जवळ असूनही ते आंदोलनाकडे फिरकले नसल्याने आंदोलनकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासनाकडून केली जाणारी टाळाटाळ पाहता, अंबड तालुक्यातील साष्टपिंपळगाव येथील ग्रामस्थांनी गावातच ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. या आंदोलनाला १९ दिवसांत तब्बल १ हजारपेक्षा अधिक गावांतील ग्रामस्थांनी भेटी दिल्या आहेत. बहुतांश ठिकाणी दुचाकी रॅली काढून आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला. सरकारला जागे करण्यासाठी अन्नत्याग आंदोलन देखील सुरू करण्यात आले; परंतु तरीही सरकारने दुर्लक्ष केले आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह इतर मंत्र्यांनी आंदोलनाला भेटी देऊन पाठिंबा दर्शविला आहे. त्यातच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दोन दिवसांपूर्वीच औरंगाबाद येऊन गेले. जवळ येऊनही त्यांनी आंदोलनाला भेट न दिल्याने आंदोलनकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सरकारने आंदोलनाची दखल न घेतल्यास राज्यात तीव्र आंदोलन करू, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. त्यातच मागील २० दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी देखील भेट दिली नसल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. यावेळी वैभव औताडे, अभिषेक पैठणे, विकास औटे, परमेश्वर कासुळे, अशोक घुमरे, श्याम तांबडे आदींची उपस्थिती होती.