चक्रधर स्वामी सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीचे आद्य प्रणेते - बडवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:29 IST2021-09-11T04:29:56+5:302021-09-11T04:29:56+5:30
या सत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. सतीश बडवे हे होते, तर प्रमुख ...

चक्रधर स्वामी सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीचे आद्य प्रणेते - बडवे
या सत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. सतीश बडवे हे होते, तर प्रमुख व्याख्याते म्हणून डॉ. हंसराज जाधव यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना डॉ. सतीश बडवे म्हणाले की, महानुभाव संप्रदायात चक्रधर स्वामींच्या विचारांचा वसा पुढे नेत संप्रदायातील पुरुष आणि स्त्रियांनी मिळून खऱ्या अर्थाने परिवर्तन केले आहे. ज्या काळात स्त्रियांना शिक्षणाची दारे बंद होती, त्या काळात महानुभावांच्या अनेक मठ मंदिरात पुरुषांनी स्त्रियांचे शिष्यत्व पत्करले. ही बाब इतर संप्रदायात पाहायला मिळत नाही. महदंबा, उपाध्य कामळाऊसा, नागांबिका यांच्यापासून चालत आलेली ही परंपरा फार मोठी आहे. या सर्वांमागची प्रेरणा होते सर्वज्ञ श्री चक्रधर. चक्रधरांचे जीवन खऱ्या अर्थाने विशाल समुद्रासारखे आहे. त्यांच्या जीवनाचे प्रतिबिंब लीळाचरित्रात पाहायला मिळते. लीळाचरित्र केवळ महानुभावांचा ग्रंथ नाही तर ते महाराष्ट्राचे जीवनचरित्र आहे, असेही ते म्हणाले.
डॉ. हंसराज जाधव म्हणाले की, महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीच्या अग्रस्थानी चक्रधर स्वामी आहेत. परंतु बऱ्याच परिवर्तनवादी विचारवंतांनी चक्रधर स्वामी न अभ्यासल्यामुळे ते स्वामींपर्यंत पोहोचू शकले नाहीत. जीवनाचा खरा अर्थ समजण्यासाठी प्रत्येकाने एकदा चक्रधर स्वामींचे विचार अभ्यासायला हवेत. चक्रधरांनी केलेली स्त्री स्वातंत्र्याची चळवळ, जातीभेद निर्मूलन, चातुर्वर्ण्य व्यवस्थेविरुद्ध केलेले बंड प्रत्येकाने अभ्यासायला हवे, असेही ते म्हणाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन भारतभूषण शास्त्री यांनी केले.