जीवरेखा धरण कालव्याच्या गेटचे रॉड तुटल्याने कालवा ओव्हरफ्लो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:58 IST2021-02-05T07:58:44+5:302021-02-05T07:58:44+5:30
७ तासांच्या अथक परिश्रमानंतर गेट बंद करण्यात आले यश टेंभुर्णी : जाफराबाद तालुक्यातील अकोलादेव येथील जीवरेखा धरण कालव्याच्या मुख्य ...

जीवरेखा धरण कालव्याच्या गेटचे रॉड तुटल्याने कालवा ओव्हरफ्लो
७ तासांच्या अथक परिश्रमानंतर गेट बंद करण्यात आले यश
टेंभुर्णी : जाफराबाद तालुक्यातील अकोलादेव येथील जीवरेखा धरण कालव्याच्या मुख्य गेटचे रॉड तुटल्याने धरणातून प्रचंड दाबाने पाण्याचा विसर्ग सुरू झाला होता. ही घटना मंगळवारी सकाळी घडली. दरम्यान, या कामी कर्तव्य बजावणाऱ्या पाटबंधारे विभागाच्या तीन कर्मचाऱ्यांच्या मदतीला अकोलादेव येथील शेकडो ग्रामस्थ धावून आल्याने पुढील मोठा अनर्थ टळला. सध्या धरण पाण्याने तुडुंब भरले असताना असा प्रकार घडल्याने धरण व कालव्याच्या सुरक्षिततेकडे पाटबंधारे विभागाचे लक्ष आहे काय ? असा प्रश्न ग्रामस्थांतून उपस्थित केले जात आहे.
याबाबत माहिती अशी की, यावर्षी जीवरेखा धरण तुडुंब भरल्याने या धरणातून काढलेल्या कालव्याद्वारे रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना पाणी पुरविले जात आहे. साधारण दीड महिन्यापूर्वी धरणातून पहिल्यांदा पाणी सोडण्यात आले होते. त्यानंतर आता दुसऱ्या वेळच्या पाण्यासाठी कालव्याचे गेट उघडण्यासाठी मंगळवारी कर्मचारी गेले असता गेटचे मुख्य रॉड तुटून गेले. यामुळे गेट संपूर्ण उघडल्याने धरणातून प्रचंड दाबाने पाणी कालव्यात वाहू लागले. बघता बघता कालवा ओव्हरफ्लो होऊन अकोलादेव येथील जिल्हा परिषद शाळेजवळ कालव्याच्या भिंतीवरून पाणी वाहू लागले.
हा प्रकार गावकऱ्यांच्या लक्षात येताच अकोलादेव येथील जवळपास २०० युवक व ग्रामस्थ धरणाकडे धावले. तोपर्यंत पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांसह गेट दुरूस्ती मॅकेनिकल तेथे उपस्थित झाले होते. मात्र, पाण्याच्या प्रचंड दाबामुळे गेट दुरुस्तीचे काम अशक्य झाले होते. अखेर युवक व ग्रामस्थांनी दगड, माती, पलाट्याचे फास असे हातात पडेल ते साहित्य गेटजवळ टाकून ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर हे पाणी कसेबसे रोखले गेले. याकामी पाटबंधारे विभागाचे कालवा निरीक्षक बी. आर. जगदाळे, बबन छडीदार, कोलते आदींसह अकोलादेव व परिसरातील ग्रामस्थांनी पुढाकार घेतला. दरम्यान, ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे पुढील अनर्थ टळला असला तरी गेटच्या दुरुस्तीकडे उन्हाळ्यातच लक्ष का दिले गेले नाही? तालुक्यातील सर्वात मोठ्या या धरणाच्या सुरक्षिततेबाबत पाटबंधारे विभाग इतके उदासिन का ? असे अनेक प्रश्न शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.
चौकट
कालव्याच्या गेटच्या दुरुस्तीचे काम यावर्षी उन्हाळ्यात केले गेले होते. मात्र, मागील दीड महिन्यापूर्वी कालव्यातून पहिले पाणी सोडल्यानंतर गेट बंद करताना रॉड नादुरुस्त झाला होता. आता त्यावर पाण्याचा प्रचंड दाब आल्याने दुसऱ्या पाण्यासाठी गेट उघडताना रॉड तुटून गेला. सध्या कर्मचारी व ग्रामस्थांच्या मदतीने गेट पूर्णत: दाबण्यात आले आहे. उन्हाळ्यात पाणी कमी झाल्यानंतर गेटची पूर्ण दुरुस्ती केली जाईल.
माधुरी जुन्नारे, शाखा अभियंता, पाटबंधारे विभाग, टेंभुर्णी.