६६ ग्रामपंचायतींवर भाजपचे वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:30 IST2021-02-13T04:30:07+5:302021-02-13T04:30:07+5:30
भोकरदन : तालुक्यातील ९१ ग्रामपंचायतींपैकी ६६ ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकला असून, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार संतोष दानवे यांच्या ...

६६ ग्रामपंचायतींवर भाजपचे वर्चस्व
भोकरदन : तालुक्यातील ९१ ग्रामपंचायतींपैकी ६६ ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकला असून, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार संतोष दानवे यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले आहे, तर महाविकास आघाडीच्या ताब्यात २५ ग्रामपंचायती गेल्या आहेत. माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्या गावात भाजपचा सरपंच झाला असून, हा राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का मानला जात आहे.
माजी आमदार चंद्रकांत दानवे यांचे जन्मगाव असलेल्या पिंपळगाव सुतार येथे भारतीय जनता पार्टीने राष्ट्रवादी काँग्रेसला जबरदस्त धक्का देऊन गावच्या सरपंचपदी भाजपच्या शारदा मुकुंद मनोहर यांची बिनविरोध निवड झाली आहे. पिंपळगाव सुतार ग्रामपंचायतीची निवडणूक माजी आमदार चंद्रकांत दानवे यांनी प्रतिष्ठेची केली होती. सरपंचपदासाठी राखीव असलेल्या अनुसूचित जातीच्या जागेवर उभ्या असलेल्या राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या उमेदवाराचा स्थानिक मतदारांनी पराभव करून त्या ठिकाणी भाजपपुरस्कृत शारदा मनोहर यांना विजयी केले होते. भोकरदन तालुक्यातील झालेल्या ९१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये सरपंच निवडीची प्रक्रिया १० ते १२ फेब्रुवारी या कालावधीत झाली. यात ६६ ग्रामपंचायतींवर भाजपचे सरपंच विराजमान झाले आहेत. सरपंच निवडीनंतर समर्थकांसह पदाधिकाऱ्यांनी मोठा जल्लोष केला.