नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४७ बसेसवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:29 IST2021-02-07T04:29:04+5:302021-02-07T04:29:04+5:30
आरटीओ विभागाची मोहीम; तीन लाखांचा दंड वसूल जालना : नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४७ खासगी बसेसवर उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे शुक्रवारी ...

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४७ बसेसवर कारवाई
आरटीओ विभागाची मोहीम; तीन लाखांचा दंड वसूल
जालना : नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४७ खासगी बसेसवर उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे शुक्रवारी रात्री कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून तीन लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे यांनी सांगितले.
राज्यात होत असलेल्या अवैध प्रवासी वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर शासनाने प्रादेशिक परिवहन विभागाला नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जालना येथील प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने शुक्रवारी रात्री उशिरा जालना-औरंगाबाद रस्त्यावरील नागेवाडी टोल नाका येथे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खासगी बसेसवर कारवाई करण्यात आली. विना परवाना अथवा परवान्याच्या अटीचा भंग करून वाहन चालविणे, टप्पा वाहतूक, प्रवासी बसमधून अवैधरीत्या मालवाहतूक, योग्यता प्रमाणपत्र नसणे, वाहनाचा कर नसणे, रिप्लेकटर, इंडीकेटर, टेल लाईट, वायपर नसणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणे व जादा भाडे आकारणे, आदी बाबींची तपासणी करण्यात आली. यात ४७ बसेसवर कारवाई करण्यात आली आहे, तर दोन बसेस ताब्यात घेतल्या आहेत. त्यांच्याकडून तीन लाखांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे, सहाय्यक प्रादेशिक अधिकारी विजय काळे, मोटार वाहन निरीक्षक उदय साळुंखे, नितीन पाटील, वाहन चालक आसाराम घुले, दीपक डोळस, लक्ष्मण सरोदे यांनी केली.
कोट
वरिष्ठांच्या आदेशानुसार शुक्रवारी रात्री नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली. तब्बल ४७ बसेसवर कारवाई करून ३ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच दोन बसेस ताब्यात घेण्यात आल्या आहेत.
विजय काठोळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी
------------------