३०० रोहित्रांची वीज गुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:36 IST2021-02-17T04:36:31+5:302021-02-17T04:36:31+5:30

फकिरा देशमुख भोकरदन : थकीत वीज बिल वसूल करण्यासाठी महावितरणकडून तालुक्यातील ३०० रोहित्रांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. परिणामी ...

300 Rohitras power outage | ३०० रोहित्रांची वीज गुल

३०० रोहित्रांची वीज गुल

फकिरा देशमुख

भोकरदन : थकीत वीज बिल वसूल करण्यासाठी महावितरणकडून तालुक्यातील ३०० रोहित्रांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. परिणामी पाण्याअभावी हातातोंडाशी आलेली पिके वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात असून, शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

महावितरण कंपनीच्या वतीने शेतकऱ्यांकडील थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी मोहीम हाती घेतली आहे. तालुक्यात शेतकरी ग्राहकांची संख्या २५ हजार ३३० एवढी असून, एकूण थकबाकी ३२७ कोटी रुपये आहे. तालुक्यातील २ हजार ५०० रोहित्रांपैकी ३०० रोहित्रांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. ऐन पीक शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले असताना महावितरणने वीजपुरवठा खंडित करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत अत्यंत संतापाची लाट निर्माण झाली आहे. तालुक्यात मका, गहू, कांदा सिड्स, बाजरी, ज्वारी, हरबरा ही पिके मोठ्या प्रमाणात घेण्यात आली आहेत. सदर पिके हे दाणे भरण्याच्या परिस्थितीत आहेत. नेमके अशाच परिस्थितीत महावितरण कंपनीने वीज पुरवठा खंडित केल्यामुळे शेतकऱ्यांच्या हाताशी आलेला घास वाळून जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकारच्या या वीज बिल वसुली मोहिमेबाबत शेतकऱ्यांत तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे.

शेतकऱ्यांनी वीज बिल भरावे

शासकीय योजनेनुसार शेतकऱ्यांनी अर्धे थकीत वीज बिल भरले तर अर्धे थकीत वीज बिल माफ होणार आहे. तालुक्यातील अडीच हजार राेहित्रांपैकी ३०० रोहित्रांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. वीज बिल वसुलीचे तीन कोटी रूपयांचे उद्दिष्ट देण्यात आले असून, आजवर १३ लाख रूपये वसूल झाले आहेत. शेतकऱ्यांनी शासकीय योजनेचा लाभ घेऊन थकीत वीज बिल भरणे गरजेचे आहे.

दीपक तुरे, उप कार्यकारी अभियंता

Web Title: 300 Rohitras power outage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.