भारताशी पंगा घेणं पडतंय महागात! पाकिस्तानमध्ये पाण्यासाठी हाहाकार, पीक पेरणीवरही मोठा परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 11:26 IST2025-06-02T11:23:02+5:302025-06-02T11:26:33+5:30
Water Crisis In Pakistan : पाकिस्तान सध्या तीव्र पाणी संकटाचा सामना करत आहे. शेतीचा खरीप हंगाम सुरू असताना देशातील ...

भारताशी पंगा घेणं पडतंय महागात! पाकिस्तानमध्ये पाण्यासाठी हाहाकार, पीक पेरणीवरही मोठा परिणाम
Water Crisis In Pakistan :पाकिस्तान सध्या तीव्र पाणी संकटाचा सामना करत आहे. शेतीचा खरीप हंगाम सुरू असताना देशातील अनेक भागांमध्ये पाण्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या आणि कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या पाकिस्तानसाठी ही परिस्थिती अधिकच बिकट बनत चालली आहे. भारताने अलीकडेच सिंधू पाणी करार स्थगित केल्याने या संकटात अधिक भर पडली आहे.
भारताचा कडक इशारा
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला कठोर इशारा दिला. सीमापार दहशतवाद रोखण्यात अपयशी ठरल्याने भारताने सिंधू पाणी करार तात्काळ स्थगित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही" असे ठाम विधान करत भारताची भूमिका स्पष्ट केली आहे.
धरणांचे पाणी साठे अर्ध्यावर
सिंधू नदी प्रणालीतील प्रमुख धरणांपैकी मंगला आणि तारबेला धरणांमधील पाण्याची पातळी गंभीर पातळीवर खाली आली आहे. इंडस रिव्हर सिस्टिम अथॉरिटीच्या (IRSA) माहितीनुसार, मंगला धरणाची एकूण क्षमता ५.९ दशलक्ष एकर फूट (MAF) असून, सध्या फक्त २.७ एमएएफ पाणी शिल्लक आहे. तर, तारबेला धरणाची क्षमता ११.६ एमएएफ असून, त्यामध्ये केवळ ६ एमएएफ पाणी उरले आहे.
खरीप हंगाम धोक्यात
पाण्याच्या टंचाईमुळे खरीप पिकांची पेरणी धोक्यात आली आहे. सिंधू नदीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या पंजाब आणि सिंध प्रांतांमध्ये सिंचन आणि वीज निर्मितीवर गंभीर परिणाम होत आहे. चिनाब नदीतून येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहातही भारताने केलेली कपात पाकिस्तानसाठी अडचणीची ठरत आहे.
आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर पाकिस्तानचा आक्रोश
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पाण्याच्या समस्येवर जागतिक पातळीवर आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी अनेकदा भारतासोबत चर्चेची विनंती केली असली, तरी भारताने दहशतवाद आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीर या मुद्द्यांवरच चर्चा होईल, हे स्पष्ट केले आहे.