बलुच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानपासून बलुचिस्तान स्वतंत्र झाल्याची घोषणा केलेली आहे, भारताकडे दिल्लीत दुतावास उघडण्याची मागणी केली आहे. अशातच बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी लष्करावर जोरदार हल्ले चढविले जात आहेत. बीएलएने पाकिस्तानी सैन्यावर ५१ ठिकाणी ७१ हल्ले केले आहेत.
बलुचिस्तानींचा पाकिस्तानविरोधात उठाव करण्यामागे विदेशी शक्ती असल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे. तर बीएलएने हे आरोप फेटाळले आहेत. आमच्या भागात एक नवीन व्यवस्था गरजेची झाली आहे, यामुळे आम्ही हा पर्याय असून एक गतीशील आणि निर्णायक पार्टी जाहीर करत आहोत, असे बीएलएने म्हटले आहे.
पाकिस्तानी लष्करी आणि गुप्तचर संस्थांना लक्ष्य करून व्यापलेल्या बलुचिस्तानमधील ५१ हून अधिक ठिकाणी ७१ हल्ले केल्याचा दावा बीएलएने केला आहे. तसेच भारताचा उल्लेख करत पाकिस्तानकडून शांतता, युद्धबंदी आणि बंधुत्वाच्या सर्व चर्चा म्हणजे फक्त एक धोका आहे. ही त्यांची युद्धनीती आणि तात्पुरती चाल आहे. हे असे राज्य आहे ज्यांचे हात रक्ताने माखलेले आहेत आणि ज्यांचे प्रत्येक वचन रक्ताने माखलेले आहे, असेही बीएलएने म्हटले आहे. बीएलएने एक प्रेस रिलीज जारी करून हा दावा केला आहे.
पाकिस्तान फक्त जागतीक दहशतवाद्यांना जन्माला घालण्याचे केंद्र नाही तर लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि आयसिस सारख्या घातक दहशतवादी गटांच्या राज्य-पुरस्कृत वाढीचे केंद्रही आहे. दहशतवादामागील नेटवर्क आयएसआय आहे. पाकिस्तान हिंसक विचारसरणी असलेला अणुशक्तीधारी देश बनला आहे, असा आरोप बीएलएने केला आहे.
याचबरोबर पाकिस्तानी लष्कराला कसे लक्ष्य केले जात आहे, याचे व्हिडीओ बीएलए जारी करत आहे. युक्रेन युद्धात जसे रशियन सैन्यावर ड्रोनद्वारे हल्ले केले जात होते, तसेच हल्ले बीएलए पाकिस्तानी सैन्यावर करत आहे. डोंगर कड्यांवर उंचावर लपून खाली असलेल्या पाकिस्तानी सैन्यावर गोळीबार केला जात आहे. यामुळे पाकिस्तानी सैन्य चांगलेच नामोहरम झाले आहे.