इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 12:28 IST2026-04-08T12:27:32+5:302026-04-08T12:28:24+5:30
North Korea News: अमेरिका आणि इराणमधील संघर्ष थांबल्याने संपूर्ण जग सुटकेचा निश्वास टाकत असतानाच आशिया खंडातील दोन देशांमध्ये तणाव वाढला आहे. किम जोंग उनच्या नेतृत्वाखालील उत्तर कोरियाने एक बॅलेस्टिक मिसाईल डागल्याने आज जपानमधील पंतप्रधानांच्या कार्यालयाने अचानक तातडीचा इशारा प्रसिद्ध केला.

इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल
गेल्या ४० दिवसांपासून आखातामध्ये अमेरिका आणि इस्राइलने इराणविरोधात सुरू केलेलं युद्ध दोन्ही बाजूंनी करण्यात आलेल्या युद्धविरामाच्या घोषणेमुळे काही काळासाठी थांबलं आहे. हा संघर्ष थांबल्याने संपूर्ण जग सुटकेचा निश्वास टाकत असतानाच आशिया खंडातील दोन देशांमध्ये तणाव वाढला आहे. किम जोंग उनच्या नेतृत्वाखालील उत्तर कोरियाने एक बॅलेस्टिक मिसाईल डागल्याने आज जपानमधील पंतप्रधानांच्या कार्यालयाने अचानक तातडीचा इशारा प्रसिद्ध केला. तसेच जपान सरकारने त्वरित खबरदारी घेत संबंधित विभागांना सक्रिय केले.
उत्तर कोरियाकडून गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने क्षेपणास्त्र चाचण्या सुरू आहेत. या चाचण्या जपान दक्षिण कोरिया आणि अमेरिकेसाठी चिंतेची बाब ठरल्या आहेत. दरम्यान, उत्तर कोरियाकडून आज करण्यात आलेल्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत जपान सरकारने सांगितले की, या क्षेपणास्त्राची दिशा, त्याने गाठलेली उंची आणि लांबी यांची माहिती गोळा केली जात आहे. या क्षेपणास्त्र चाचणीत कुठलंही नुकसान झाल्याचं वृत्त नाही आहे. मात्र नागरिकांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.
जपान सरकारने पुढे सांगितले की, उत्तर कोरियाने डागलेलं हे क्षेपणास्त्र जपानच्या हद्दीत पडलेलं नाही. मात्र संपूर्ण देशात सतर्कता वाढवण्यात आली आहे. मिळणारी माहिती योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने जनतेपर्यंत पोहोचवा, असे आदेश जपानच्या पंतप्रधानांनी सर्व अधिकाऱ्यांना दिले आहेत.
उत्तर कोरियाकडून हल्ल्याचा धोका असल्याने जपान उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्रांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून असतो. उत्तर कोरियाकडून जेव्हा क्षेपणास्त्र डागलं जातं. तेव्हा जपानच्या पंतप्रधान कार्यालयातून तातडीने इमर्जन्सी अलर्ट प्रसिद्ध केला जातो. या इशाऱ्यानंतर सरकारची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणाही तातडीने सक्रिय होते.