नवी दिल्ली : ॲक्झिऑम-४ मोहिमेअंतर्गत अवकाशात झेपावलेले भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला व अन्य तीन अंतराळवीर भारतीय वेळेनुसार गुरुवारी संध्याकाळी ४ वाजून १ मिनिटांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले. त्यामुळे शुभांशू हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचणारे पहिले भारतीय आणि अंतराळात प्रवास करणारे दुसरे भारतीय ठरले आहेत. याआधी, ४१ वर्षांपूर्वी १९८४ मध्ये राकेश शर्मा यांनी सोवियत युनियनच्या अंतराळयानातून अवकाशात प्रवास केला होता.
शुभांशू यांना घेऊन जाणारे ड्रॅगन अवकाशयान स्थानकावरील प्रयोगशाळेशी जोडले गेले. या अंतराळयानाला अंतराळवीरांनी ग्रेस असेही नाव ठेवले आहे. फाल्कन-९ रॉकेटच्या साहाय्याने ड्रॅगन यानातून शुभांशू शुक्ला, अमेरिकेच्या पेगी व्हिटसन, हंगेरीच्या टिबोर कापू आणि पोलंडच्या स्लावोश उझ्नान्स्की हे आंतरराष्ट्रीय स्थानकावर पोहोचलेत.
...अन् आईच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले
शुभांशू शुक्ला व त्यांचे तीन अंतराळवीर सहकारी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर दाखल झाले. त्या क्षणाबद्दल शुक्ला यांची आई आशा शुक्ला यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर आपल्या सहकाऱ्यांसोबत दाखल झालेल्या शुभांशू यांनी मोठी कामगिरी केली आहे. आता त्यांच्या सुरक्षितरीत्या पृथ्वीवर परत येण्याकडे आमचे डोळे लागले आहेत. आपल्या मुलाच्या कामगिरीमुळे त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळत होते.
पृथ्वीभोवती भ्रमण करत असताना...
अवकाशात झेपावल्यानंतर ड्रॅगनमधून पृथ्वीभोवती भ्रमण करत असताना सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाच्या स्थितीत मी लहान बाळासारख्या अनेक गोष्टी शिकत आहे.
निर्वात वातावरणात तरंगण्याचा अनुभवही विलक्षण आहे, असे भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी गुरुवारी अंतराळातून संवाद साधताना सांगितले. ‘ड्रॅगन’ला अंतराळवीरांनी ग्रेस असे नाव ठेवले आहे.
पहिले भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा म्हणाले, पृथ्वी सर्वांची, एकाची नाही
नवी दिल्ली : अंतराळ प्रवास मानवाच्या विचारसरणीवर प्रभाव टाकतो. त्याची जगाकडे पाहण्याची दृष्टीच बदलतो. ही पृथ्वी सर्वांची आहे, कोणा एकाची नाही असा विचार त्याच्या मनात रुजतो, असे अंतराळ प्रवास करणारे भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांनी सांगितले. १९८४ साली रशियाच्या अवकाशयानातून त्यांनी अंतराळ सफर केली होती. त्यानंतर तब्बल ४१ वर्षांनी भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ल यांनी अवकाशात झेप घेतली. त्या पार्श्वभूमीवर शर्मा यांनी हे वक्तव्य केले.
दोन महिन्यांत शिकले रशियन भाषा
संरक्षण मंत्रालयाने हवाई दलाचे माजी स्क्वॉड्रन लीडर राकेश शर्मा यांचे विचार एका पॉडकास्टद्वारे प्रसारित केले. त्यांनी सांगितले की, अवकाश सफरीचे प्रशिक्षण व संपूर्ण मोहिमेत सहकाऱ्यांशी फक्त रशियन भाषेत बोलावे लागणार होते. त्यामुळे ही भाषा मी दोन महिन्यांत शिकून घेतली.
अंतराळातून भारत कसा दिसतो?
राकेश शर्मा यांनी म्हटले आहे की, अंतराळातून भारत व पृथ्वी या गोष्टी अलौकिक वाटतात. भारताचे विविध भूभाग, समुद्रकिनारे, घाट, सपाट मैदाने, उष्णकटिबंधीय जंगल, हिमालयाच्या पर्वतरांगा हे सारे विलोभनीय दिसते. अंतराळात दिवस आणि रात्री खूप विचित्र असतात. तिथे सूर्योदय व सूर्यास्त दर ४५ मिनिटांनी होतात.