मॉस्को - जागतिक राजकारणात रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांनी जबरदस्त डाव टाकला आहे. भारत आणि चीन यांच्यातील सीमेवरील तणाव कमी होत आहे, आता वेळ आलीय RIC पुन्हा एका उभं करायची असं लावरोव यांनी म्हणत रशिया, भारत आणि चीन असा त्रिकोण तयार करण्याचे संकेत दिलेत. या तिन्ही देशांनी मिळून पाश्चिमात्य ताकदींना विशेषत: नाटोविरोधात एक मजबूत पर्याय उभा करण्याचा प्रयत्न रशिया करत असल्याचं दिसून येते. लावरोव यांच्या विधानाने डोनाल्ड ट्रम्प यांचे टेन्शन नक्कीच वाढणार आहे.
सर्गेई लावरोव यांनी नाटोवर जोरदार हल्ला करत आरोप केला की, नाटो भारताला चीनविरोधातील षडयंत्रात अडकवत आहे. भारत नाटोची ही खेळी ओळखून असल्याचं आमच्या भारतीय मित्रांकडून स्पष्ट झाले असं त्यांनी सांगितले. रशियाचे हे विधान अशावेळी आले आहे जेव्हा अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतिन यांना आगीशी खेळणारे म्हटलं. काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी रशियाशी मैत्रीसाठी पुढाकार घेतला होता परंतु आता अचानक रशियाविरोधात भूमिका घेत आहे.
RIC त्रिकोण काय आहे?
RIC त्रिकोणची कहाणी २००६ पासून सुरू झाली जेव्हा भारताचे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग, चीनचे जिंताओ आणि रशियाचे व्लादीमीर पुतिन यांनी हात मिळवला. ब्रिक्सचा पाया इथेच रचला गेला परंतु २०२० साली गलवान खोऱ्यात चीन-भारतात झालेल्या संघर्षानंतर त्रिकोण चर्चा थांबली. दुसरीकडे भारत-चीन यांच्यातील तणाव आणि चीनकडून पाकिस्तानला शस्त्रे पुरवठा करणे भारतासाठी डोकेदुखी बनला. आता चीन पाकिस्तानला पाचव्या पिढीतील फायटर जेट देण्याची तयारी करत आहे. त्यामुळे भारत पुन्हा RIC त्रिकोणात कसा सहभागी होणार हा प्रश्न आहे.
दरम्यान, नाटो भारताला त्यांच्या जाळ्यात अडकवत आहे असं लावरोव यांनी म्हटलं असले तरी भारतानेही राजकीय डावपेच आखले आहेत. एकीकडे रशिया भारताचा जुना मित्र आहे तर दुसरीकडे भारताने १-३ जून या काळात यूरोपीय संघासोबत हिंद महासागरात जोरदार नौदल सराव सुरू करत आहे. हा सराव समुद्री दरोडे रोखणे, युद्ध कौशल्य आणि संचार मजबूत करण्यावर केंद्रित आहे. नाटो आणि पाश्चिमात्य देशांसोबत भारताची जवळीक रशियाला आवडली नाही. चीनच्या नापाक खेळीमुळेही भारत सतर्क आहे. त्यामुळे आरआयसीबाबत रशिया बोलत असला तरीही पाकिस्तानला हाताशी धरून भारतावर कुरघोडी करण्याच्या चीनसोबत भारत जाणार का हा मोठा प्रश्न आहे.