मुंबई - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये जेमतेम ४.९ टक्के जलसाठा उरल्यामुळे मुंबईत पाणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. संकटकाळासाठी राखून ठेवलेल्या जलसाठ्यातून पाणीपुरवठा करण्यास महापालिका प्रशासनाने आता सुरुवात केली आहे. अशा चिंताजनक स्थितीत पावसाने शुक्रवारी सुखद दिलासा दिला. गुरुवारी रात्रीपासून पावसाने सुरुवात केली आहे.मुंबईला पाणीपुरवठा करणाºया सात तलावांमध्ये एकूण ७१ हजार दशलक्ष लीटर जलसाठा शिल्लक आहे. हा जलसाठा ३१ जुलैपर्यंत पुरेल इतका असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. मात्र तलावांमध्ये सतत जलसाठा कमी होत असल्याने पाणीप्रश्न पेटण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे सर्वांचेच लक्ष पावसाकडे लागले होते. गुरुवारी संध्याकाळी पावसाची संततधार सुरू राहिली. मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील तलाव क्षेत्रांतही शुक्रवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. मुंबईत असलेल्या विहार आणि तुलसी तलावांत जोरदार पाऊस पडला. तर, मोडक सागर, तानसा, अप्पर वैतरणा तलाव क्षेत्रांमध्येही पाऊस बरसत होता.
मुंबईकरांना दिलासा; तलाव क्षेत्रात पावसाने खाते उघडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2019 06:10 IST