पाकिस्तानची वाटचाल लष्करी राजवटीच्या दिशेने...; असीम मुनीर बनले दुसरे फिल्ड मार्शल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 12:47 IST2025-05-21T12:46:28+5:302025-05-21T12:47:02+5:30
भारतापासून वेगळा होऊन पाकिस्तान जरा कुठे सांभाळत होता तितक्याच तिथल्या लोकशाहीचा गळा दाबला गेला. याला जबाबदार होते जनरल अयूब खान, ज्यांनी तख्तापालट करून सत्ता काबीज केली

पाकिस्तानची वाटचाल लष्करी राजवटीच्या दिशेने...; असीम मुनीर बनले दुसरे फिल्ड मार्शल
कराची - ऑपरेशन सिंदूरमधून भारताने पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला. पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने पाकिस्तानात घुसून ९ दहशतवादी तळांना टार्गेट केले. त्यात १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले. या हल्ल्यानंतर पाकिस्तान आता लष्करी राजवटीकडे जाण्याचे संकेत मिळत आहेत. अलीकडच्या काळात ज्या घटना पाकिस्तानात घडत आहेत त्या पाहता लवकरच पाकिस्तानात तख्तापालट होईल असं बोलले जाते. पाकिस्तानात सध्या लष्कर सरकारपेक्षा वरचढ होत असल्याचं दिसून येते.
पाकिस्तान सरकारने त्यांच्या सध्याचे सैन्य प्रमुख जनरल आसीम मुनीर याला फिल्ड मार्शल पदवी दिली आहे. आता जनरल मुनीर पाकिस्तानी सैन्य इतिहासातील माजी सैन्य शासक जनरल मोहम्मद अयूब खाननंतर फिल्ड मार्शल बनणारे दुसरे सैन्य प्रमुख बनले आहेत. हे पद ज्याला दिले त्याने पाकिस्तानात लष्करी राजवट आणली होती. पाकिस्तानातील सध्याची स्थिती सैन्य वरचढ होऊन जनरल मुनीर यांची ताकद वाढवण्यासोबतच शहबाज शरीफ यांच्या पायाखालीच जमीन सरकताना दिसत आहे.
भारतापासून वेगळा होऊन पाकिस्तान जरा कुठे सांभाळत होता तितक्याच तिथल्या लोकशाहीचा गळा दाबला गेला. याला जबाबदार होते जनरल अयूब खान, ज्यांनी तख्तापालट करून सत्ता काबीज केली. तिथून पाकिस्तानच्या भवितव्याचे निर्णय सैन्याच्या देखरेखीत होऊ लागले. पाकिस्तानचा इतिहास पाहता तिथे केवळ लोकशाही नावाला राहिली आहे खरी ताकद कायम सैन्याच्या हाती आहे. सैन्याच्या सावलीखाली दहशतवाद फोफावला. धार्मिक कट्टरता, जिहाद वाढला.
१९५८ साली पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदा लोकशाहीची हत्या झाली. त्यावेळी देशात पहिले राष्ट्रपती मेजर जनरल इसकंदर मिर्जा यांनी संसद आणि तत्कालीन पंतप्रधान फिरोज खान नून यांचे सरकार भंग करून देशात मार्शल लॉ लागू केला. त्यासोबतच त्यांनी आर्मी चीफ जनरल अयूब खान यांना सत्तेची कमान सोपवली. मात्र अवघ्या १३ दिवसांत इसकंदर मिर्जा यांनाही सत्तेबाहेर काढत अयूब खान यांनी राष्ट्रपतींची गादी सांभाळली. त्यानंतर १९६९ पर्यंत अयूब खान पाकिस्तानचे राष्ट्रपती राहिले आणि संपूर्ण देशाची सत्ता राजेशाहीसारखी चालवली.