नवी दिल्ली : भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान पाकिस्तानातील जाहीर केलेल्या ठिकाणांपेक्षा जास्त ठिकाणांवर हल्ले केले होते, असा खुलासा पाकिस्तानच्या अधिकृत दस्तऐवजातून (डोसियर) झाला आहे. ‘ऑपरेशन बुनयान उन मर्सूस’ या नावाने पाकिस्तानने तयार केलेल्या दस्तावेजात भारताने केलेल्या सात ठिकाणांच्या हल्ल्यांचा उल्लेख आहे. मात्र, ही ठिकाणे भारतीय हवाई दल किंवा सैन्य संचालनालयाच्या पत्रकार परिषदांमध्ये जाहीर केलेली नव्हती.
...अन् युद्धविरामासाठी पाकिस्तानने केली विनंती
पाकिस्तानी नकाशांमध्ये पेशावर, झांग, सिंधमधील हैदराबाद, पंजाबमधील गुजरात, भवालनगर, अटक आणि चोर या ठिकाणांवर हल्ले झाल्याचे नमूद आहे. या नव्या माहितीनुसार, भारताने पाकिस्तानात अपेक्षेपेक्षा खूप आतपर्यंत घुसून कारवाई केली आणि त्यामुळेच पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनंती केल्याचे स्पष्ट होते. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने केलेल्या प्रत्युत्तरात्मक कारवाईची माहिती भारताने आधीच दिली होती.
भारताने जाहीर केलेली ठिकाणे
बहावलपूर (जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय), लष्कर-ए-तोयबाचे प्रशिक्षण केंद्र (मुरीदके), मुझफ्फराबाद, कोटली, रावलकोट, चकस्वरी, भिंबर, नीलम व्हॅली, झेलम, चकवाल, नूर खान, रफिकी, मुरीद, सुक्कुर, सियालकोट, पसरूर, चुनियान, सरगोधा, स्कारू, भोलारी, जेकबाबाद (सर्व हवाई तळ)
भारताची रणनीती?: काही ठिकाणांचा उल्लेख न करणे ही भारताची पाकिस्तानकडूनच नुकसानाची पुष्टी व्हावी, यासाठीची सुनियोजित रणनीती असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यापूर्वी, मॅक्सार टेक्नॉलॉजीजने जारी केलेल्या उपग्रह प्रतिमांमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान अचूक हल्ल्यांमुळे झालेले नुकसान उघड झाले.
या धडक कारवाईनंतर
भारताने स्पष्ट केले की, देशात कोणतीही दहशतवादी घटना आता युद्ध म्हणून पाहिली जाईल आणि कठोर कारवाई केली जाईल.